‘ई-सकाळ‘च्या एका वाचकाने सुचविल्यानुसार मी हा लेख लिहिला आहे. हा लेख परिचयापुरताच असल्यामुळे मी तो खूपच ढोबळपणे लिहिलेला आहे. या विषयावर शोधावी तितकी माहिती आंतरजालावरील अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. माहितीच्या विपुलतेमुळे आणि विषयही गुंतागुंतीचा असल्यामुळे खरे तर या विषयावर एखादी लेखमालाच लिहावी लागेल. कारण, या युद्धातील परिस्थिती आणि युद्धात गुंतलेले खेळाडू रोज बदलत आहेत. आताच रशियाने या युद्धात उडी घेतली असून अमेरिकेने एक पाऊल मागे घेतले आहे. बशर अल असाद यांना अध्यक्षपदावरून बाजूला करून ‘इसिस‘ला नष्ट करण्याची अमेरिकेची इच्छा आहे; तर बशर यांना अध्यक्षपदावर कायम ठेवत ‘इसिस‘ला लक्ष्य करण्याचा रशियाचा हेतू आहे. म्हणजेच, ‘इसिस‘ दोन्ही बाजूंना नको आहे; पण बशर यांच्याबद्दल मात्र एकमत नाही. ही चळवळ संपुष्टात आली नाही, तर पाकिस्तानमार्फत ती भारताचीही डोकेदुखी होणारच आहे. म्हणूनच या संघटनेकडे, तिच्या प्रगतीकडे/विनाशाकडे डोळसपणे लक्ष देणे भारताला आवश्यक आहे. ‘परिचय करून देणे‘ एवढाच या लेखाचा प्राथमिक उद्देश आहे. तो वाचकांना आवडल्यास, उपयुक्त वाटल्यास मी त्यावर लिहित राहीन.
धन्यवाद
- सुधीर काळे
............................................................................................................
‘इसिस‘ म्हणजे ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक व अल शाम‘ (*1) ही संघटना तीन वर्षांपूर्वी अस्तित्वातच नव्हती; पण आज तिने सीरिया आणि इराकमधील बऱ्याच मोठ्या प्रदेशावर ताबा मिळविलेला आहे. ‘ट्विटर‘ आणि ‘यू-ट्युब‘च्या माध्यमांद्वारे ‘इसिस‘ने आपले ‘कर्तृत्व‘ रोज साऱ्या जगाला दाखवत हे सिद्ध केले आहे, की ती आता केवळ एक बहुराष्ट्रीय दहशतवादी संघटना राहिली नसून युद्धाच्या मोहिमा, त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या युद्धसामग्रीचा पुरवठा, मनुष्यबळ, सैनिकी हालचाकी, प्रसारमाध्यमांतून करावा लागणारा प्रचार यांसारख्या क्लिष्ट, गुंतागुंतीच्या विविध पैलूंचा तपशीलवार समन्वय करू शकेल, अशी सुविकसित व अद्ययावत अधिपत्य आणि नियंत्रण असलेली संघटना आहे. तसेच, व्यूहरचनेच्या दृष्टीने मध्यपूर्वेतील महत्त्वाची ठिकाणे काबीज करणे व ती आपल्याकडून जाऊ न देणे याबाबतीतील आपले सामर्थ्यही ‘इसिस‘ने सर्वांना दाखविलेले आहे.
त्याखेरीज काही दिवसांपूर्वीच पाल्मेरा येथील दोन हजार वर्षे जुने ‘बालशमीन‘ या नावाचे देऊन ‘इसिस‘ने स्फोटकांचा वापर करून उडविले आणि अगदी अलीकडे चार-पाच दिवसांपूर्वी त्यांनी ‘Arch of Triumph‘ उडविली. ‘बालशमीन‘ मंदिर उडविण्यास एकवेळ धार्मिक कारण असू शकेल; पण या विजय कमानीला तर काहीच धार्मिक महत्त्व नव्हते. तरीही ती का उडविण्यात आली, हे या क्षेत्रातील तज्ज्ञांनाही समजत नाही.
‘इसिस‘च्या रुपाने संपूर्ण जगासमोर उभ्या असलेल्या या संकटावर मात करण्याआधी व ती संघटना कशी जन्मली हे समजून घेण्याआधी सीरिया व सीरियाचा अलीकडील इतिहास, मध्यपूर्वेतील शिया-सुन्नी पंथांचे संख्याबळ याचा थोडक्यात परिचय करून घेणे आवश्यक आहे.
सीरियाची एकूण लोकसंख्या आहे सुमारे 2.2 कोटी. त्यात 90 टक्के नागरिक अरबी वंशाचे व 10 टक्के नागरिक कुर्द, आर्मेनियन आणि इतर वंशांचे आहेत. मुसलमान 87 टक्के आहेत. त्यातही 74 टक्के सुन्नी असून शिया, अलावी, इस्माइली वगैरे मिळून 13 टक्के, सगळ्या वंशांचे ख्रिश्चन 10 टक्के, ड्रूझ 3 टक्के आणि ज्यू अगदीच थोडे.. तेही मोठ्या शहरांमध्येच. ‘इसिस‘ ही सुन्नी पंथीय मुसलमानांची संघटना असून तिची निर्मिती केवळ सध्याच्या मध्य-पूर्वेतील शिया-सुन्नी संघर्षावर मात करण्यापुरतीच झाली आहे, की जागतिक पातळीवर मुस्लिम वर्चस्व प्रस्थापित करण्याचे लक्ष्य त्या संघटेनेपुढे आहे, हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. (*2)
मध्य-पूर्वेतील शिया-सुन्नी संख्याबळ समजून घेण्यासाठी नकाशा क्रमांक 1 पाहा.
या नकाशांकडे पाहिल्यास संपूर्ण इराण, इराकचा दक्षिण व आग्नेय भाग, येमेनचा नैऋत्य भाग, अझरबैजान हा देश, अफगाणिस्तानच्या मध्यावरचा काही भाग व भू-मध्य महासागराच्या किनाऱ्यावरील सीरियाच्या चिंचोळ्या किनारपट्टीवरच शियापंथीयांचे उल्लेखनीय संख्याबळ दिसते. बाकी साऱ्या मुस्लिम जगतात (यात मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेली इंडोनेशिया, भारत व पाकिस्तान ही तिन्ही राष्ट्रेही आली) सुन्नींचे संख्याधिक्य बऱ्याच पटीने जास्त आहे. ‘‘अल कायदा‘ ही एक सुन्नी संघटना आहे व तिच्या अल झरकावी या नेत्याने इराकी शिया पंथीयांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात शियांचे शिरकाण घडवून आणले होते,‘ असे माझ्या वाचनात आले आहे. (*3)
सीरियाबद्दलची माहिती समजून घ्यायला सध्याचे अध्यक्ष बशर अल असाद यांचे वडील हाफीज अल असाद यांच्यापासून सुरवात केली पाहिजे. (*4) अल असाद घराणे हे धर्माने शिया पंथाच्या ‘अलवाई‘ या उपपंथात मोडते. एकूण लोकसंख्येच्या फक्त 10-15 टक्केच लोकसंख्या असलेला हा उपपंथ सीरियामध्ये 1970 पासून तरी सतत सत्तेवर आहे. लष्करी उठाव करून हाफीज अल असाद 1970 मध्ये सत्तेत आले आणि 2000 मध्ये त्यांच्या मृत्युपर्यंत ते सीरियाचे अध्यक्ष होते. एकछत्री अंमल बसवून त्यांनी आधी पूर्ण सत्ता आपल्या हाती घेतली आणि सरकारी कारभाराचे सर्व विभाग व सेवा पंथानुसार वाटल्या. त्यात सुन्नी पंथियांना राजकीय संघटनांचे प्रमुखपद दिले व स्वत:च्या ‘अलवाई‘ उपपंथाच्या व्यक्तींकडे लष्कर, गुप्तचर संघटना आणि संरक्षण या बाबी सोपविल्या. ‘बाथ‘ या सत्ताधारी पक्षाला असलेल्या पूर्वीच्या अधिकारांत काटछाट करण्यात आली आणि ते सर्व अधिकार अध्यक्षांनाच (म्हणजे त्यांना स्वत:ला) देण्यात आले. अशा तऱ्हएने तेव्हापासून सीरियाचे सरकार एका पक्षाचे न राहता एका बलवान अध्यक्षांच्या नेतृत्वाखालचे एकपक्षीय सरकार बनले. यासाठी केवळ असाद या एका व्यक्तीच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या व्यक्तित्वावर आधारलेला एक कट्टर गट वा संप्रदाय उभा करण्यात आला.
जसे लष्करी क्रांतीतून सत्तेवर आलेल्या हाफीज अल असाद हे अल्पसंख्यांक शिया पंथीय असूनही त्यांनी सुन्नी बहुसंख्य असलेल्या सीरियावर सतत 30 वर्षे राज्य केले, अगदी तसेच सुन्नी पंथीय असलेल्या सद्दाम हुसेन यांनीही लष्करी क्रांतीद्वारा 1979 मध्ये सत्तेवर आल्यापासून ते त्यांना 2006 मध्ये फासावर चढवेपर्यंत शिया बहुसंख्य असलेल्या इराकवर सातत्याने राज्य केले होते.
2000 मध्ये हाफीज अल असाद यांच्या निधनानंतर त्यांचे तिसरे पुत्र बशर अल असाद अध्यक्ष झाले. तोपर्यंत बशर यांना प्रत्यक्ष राजकारणाचा काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांच्या निवडीविरुद्ध उघड टीका सुरू झाली. पण या योजनेच्या विरोधकांपैकी अनेक सरकारी अधिकाऱ्यांची पदावनती करून बशर यांनी वारसाहक्काने मिळालेल्या सत्तेवरील पकड घट्ट केली. त्यामुळे वडिलांच्या निधनापासून आजपर्यंत अध्यक्षपदी निवडून आलेले बशर अल असाद सतत सत्तेवर आहेत.
आता आपण जरा सीरियाच्या लोकसंख्येकडे व त्यांच्यातील पंथानुसारच्या संख्यांकडे पाहू.. (नकाशा क्रमांक 2, 3 आणि 4 पाहा)
लेबेनॉनच्या उत्तरेला भूमध्य महासागराच्या किनाऱ्यावर असलेली ‘लेव्हॅन्ट‘ म्हणून ओळखली जाणारी एक चिंचोळी पट्टी सोडल्यास बाकी सर्व सीरियामध्ये सुन्नीच बहुसंख आहेत. दमास्कस व अलेप्पोसारख्या प्रमुख शहरांमध्येही सुन्नी पंथियांचीच संख्या अधिक आहे. इराक व जॉर्डनच्या सीमेवरील सीरियाच्या आग्नेय भागात लोकवस्ती खूपच विरळ आहे. ईशान्येला कुर्द वंशाच्या नागरिकांची वस्ती आहे. हे लोक बऱ्याच वर्षांपासून ‘स्वतंत्र कुर्दिस्तान‘ची मागणी करत आहेत. सध्या कुर्द बहुसंख्य असलेल्या इराकमधील या प्रांताला स्वायत्त घोषित केलेले आहे; पण इराण, सीरिया व तुर्कस्तान या देशांतील कुर्द बहुसंख्य असलेले भाग हे त्या त्या देशातील एक ‘प्रांत‘ म्हणूनच अस्तित्वात आहेत आणि कमी-जास्त प्रमाणात खदखदत आहेत.
नकाशा क्रमांक 1 व 2 : अरबस्थानातील पंथनिहाय लोकसंख्येबद्दल माहिती. या नकाशांकडे पाहिल्यास बहुसंख्य शियापंथीय असलेल्या येमेनमधील सध्याच्या संघर्षाच्या कारणांची चांगली कल्पना येईल.
नकाशा क्रमांक 3 व 4 : सीरियातील लोकसंख्येची पंथनिहाय विभागणी व घनता दर्शविणाऱ्या या दोन नकाशांत बहुसंख्य शियापंथीय वस्ती लेबॅनॉनच्या उत्तरेला असलेल्या वायव्य भागातच एकवटलेली आहे, हे दिसून येते.
वरील नकाशा क्रमांक 5 मध्ये इराकमध्ये वंशानुसार, धर्मानुसार आणि पंथानुसार लोकसंख्या कशी विभागली गेली आहे, हे दिसते.
‘इसिस‘च्या जन्माचा अभ्यास करताना मला अली खेदेरी यांचा How ISIS came to be हा ‘गार्डियन‘मध्ये प्रकाशित झालेला लेख आणि टेरेन्स मॅक्कॉय यांचा How the Islamic State evolved in an American prison हा लेख खूप माहितीपूर्ण वाटले. त्या दोन्ही लेखांमधील काही माहिती मी या लेखात वापरलेली आहे.
सीरियाच्या सरकारने केलेला सुन्नी जनतेचा भीषण नरसंहारच ‘इसिस‘च्या निर्मितीच्या मुळाशी आहे, असे अली खेदेरी लिहितात. (*5) एकदा सुरू झालेला हा संहार कमी न होता चालूच राहिला आणि मध्ये पडून या नरसंहाराला आवरण्याऐवजी सारे जग त्याकडे नुसते पाहत राहिले. यामुळे आणि मारले गेलेल्या दोन लाख नागरिकांच्या, घरादारापासून, आशा-उद्दिष्टांपासून दूर फेकल्या गेलेल्या लाखो सीरियन नागरिकांच्या तिरस्काराच्या व भीतीच्या भावनांतून ‘इसिस‘ संघटना जन्माला आली, असे त्यांचे मत आहे. ‘इसिस‘च्या झपाट्याने वाढ झाली, ती बशर अल असाद या सीरियाच्या स्वार्थी व लबाड राष्ट्रप्रमुखाने केवळ सत्तेवर राहण्यासाठी ‘अल कायदा‘शी केलेल्या अविवेकी शय्यासोबतीमुळे.. आता तीच त्याच्यावर उलटत आहे, असे अली खेदेरी म्हणतात.
असाद यांचे सैन्य/गुप्तहेर खाते, लेबॅबॉनची ‘हिज्बुला‘ ही शिया संघटना, इराकचे शिया पंथीय सैन्य आणि या सर्वांना समर्थ पाठिंबा देणारे ‘सिपाहे पासदाराने इन्किलाबे इस्लामी‘ हे इराणी शिया सैन्य अशी चार सैन्ये एकत्र आली. आधी या सर्वांसमोर शांतपणे निदर्शने करणाऱ्या सीरियातील निदर्शकांचा हळूहळू भ्रमनिरास होत गेला व त्यातून आपले सर्व नागरी अधिकार काढून घेतले जात आहेत, अशी त्यांची भावना होत गेली. मग ते जहाल मतवादी, लढाऊ व दहशतवादी बनल चालले.
सीरियातील धर्मवेड्या शियापंथीय लढाऊ दहशतवाद्यांनी रासायनिक प्राणघातक शस्रास्त्रे, तोफखाना, बंदुकीच्या नळीतून फेकले जाणारे बॉम्ब अशा प्राणघातक शस्रास्त्रांचा वापर करून आपले सिंहासन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला, असाही आरोप बशर यांच्यावर केला जातो. सीरियातील सुन्नी पंथीय अरबी क्रांतिकारकांनी जागतिक पातळीवर मदत मागितली; पण कुणीही मदत केली नाही, तेव्हा त्यांनी शेवटी ‘अल कायदा‘सारख्या दहशतवादी संघटनेकडे पाठिंबा मागितला.
अशा रितीने आंतरराष्ट्रीय जिहाद्यांपासून बनलेल्या आपल्या अतिशय स्वामीनिष्ठ सैन्याचा उपयोग करत ‘अल कायदा‘ ही संघटना पुन्हा एकदा मध्य-पूर्वेच्या मध्यभागी आपले पाऊल रोवू शकली. तसेच, छिन्नविछिन्न झालेल्या लहान मुलांच्या शरीरांची व रासायनिक शस्रास्त्रांमुळे होणाऱ्या यातना सहन करणाऱ्या स्त्रियांची स्थिती पाहावी लागल्याने जगभरातील (यातील काही भारतीयही आहेत) मुस्लिम युवकही तिरस्काराने व भीतीने भडकून उठले आणि सीरियाकडे निघाले. त्यातून दिवसेंदिवस ‘इसिस‘ची शक्ती वाढत गेली.
एकीकडे सीरियामध्ये असा नरसंहार चालू असताना शेजारच्या इरकाचे अध्यक्ष नूरी अल मलिकी यांचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘व्हाईट हाऊस‘मध्ये स्वागत केले होते आणि त्यांच्या तोपर्यंतच्या कामगिरीची प्रशंसाही केली होती. वॉशिंग्टनहून परतल्यानंतर मलिकी यांनी इराकमधील सत्तेवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी आपल्या राजकीय साथीदारांना दिलेल्या वचनांचा भंग करत केवळ पंथभेदावर आधारित कारवायांना प्रारंभ केला. तारिक अल हशिमी या उपाध्यक्ष असलेल्या आपल्या प्रमुख सुन्नीपंथीय विरोधकाला अटक करण्याचे कारस्थान त्यांनी इराणच्या मदतीने रचले व अमेरिकी चिलखती वाहने, रणगाडे यांच्यासह हशिमी यांना वेढा घातला. पण यातून हशिमी निसटले आणि कुर्दिस्तानात पळाले. त्यांच्या काही रक्षकांना दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली अटक झाली व त्यातील एक रक्षक चौकशीदरम्यान मृत्यू पावला.
एका वर्षानंतर राफेआ अल एस्सावी या आणखी एका प्रभावी सुन्नीपंथीय विरोधकाच्या घराला गराडा घालण्यात आला. पण या वेढ्यातून निसटून त्यांनी ‘अनबार‘ या आपल्या जमातीच्या प्रमुख शहरामध्ये आश्रय घेतला. ते वाचले; पण त्यांची राजकीय कारकिर्द संपलीच.
या प्रकारांनी भडकलेल्या सुनीपंथीय जनतेने निषेध दर्शविण्यासाठी मोठ्या संख्येसह जोरदार उठाव केला. तसेच, सुन्नी बहुसंख्य असलेल्या विभागातील अरबी परिषदांनी कुर्दिस्तानला दिलेल्या स्वायत्ततेच्या धर्तीवर आपल्या विभागांसाठी स्वायत्ततेची मागणी केली. ही मागणी संविधानानुसार असूनही नोकरशाहीतील काही त्रुटी वापरून मलिकींनी अशा स्वायत्ततेसाठी आवश्यक तो जनमताचा कौल घेण्यात अडथळा आणला आणि त्या विरोधातील निदर्शने ही ‘अल कायदा‘च्या लुडबुडीतून आली आहेत, असा आरोप करत निदर्शने क्रूरपणे दडपून टाकली.
इराणने असाद सरकारला लष्करी युद्धसामुग्री, दारुगोळा पुरविला या बाबीकडे वॉशिंग्टनकडून ताकीद आली, तरीही मलिकींनी त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच, हजारो शियापंथीय इराकी कार्यकर्ते या शिया-सुन्नी युद्धात लढायला इराकमधून सीरियामध्ये जाऊ लागले, तिकडेही काणाडोळा केला. बद्र सैन्य, असाईब अल हक सैन्य व प्रॉमिस्ड डे ब्रिगेड या तिन्ही गटाच्या दहशतवाद्यांना मलिकी यांनी प्रोत्साहन दिले. त्यापैकी बद्र संघटनेचा प्रमुख सेनापती इराकच्या सध्याच्या हादी अल अमेरी या वाहतूकमंत्र्याचा भाऊच होता. पण यापुढेही जाऊन असाद सरकारने ‘अल कायदा‘ या सुन्नी संघटनेला या युद्धात येऊ दिले व तेदेखील यायला तयार झाले. कारण बशर अल असाद हे ‘अल कायदा‘च्या सैनिकांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि हत्यारे देतच राहिले. 2005 पासून ते 2011 च्या डिसेंबरमध्ये अमेरिकी सैन्य इराक सोडून जाईपर्यंत सहा वर्षे अमेरिकेचे अधिकारी या सर्वांविरुद्ध मलिकींना ताकीद देत असले, तरीही असाद यांचे गुप्तहेर खाते व इराणी समर्थक त्या सल्ल्याविरुद्ध वागत राहिले आणि ‘अल कायदा‘च्या सैनिकांना प्रशिक्षण देऊन त्यांना सीरियातून इराकमध्ये गोंधळ आणि विनाश करण्यासाठी पाठवत राहिले.
मग कत्तलींमुळे व छळामुळे वैतागलेल्या सीरियातील शम्मार, अनेझा यांसारख्या शक्तिशाली प्रादेशिक सुन्नी टोळ्या भूतपूर्व इराकी व सीरियन लष्करी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या आणि ‘इसिस‘च्या जिहादींना मिळाल्या. त्यांना या भागातून भरपूर आर्थिक मदतही मिळू लागली. याचा परिणाम म्हणजे, चार सुन्नी पंथीय इराकी प्रांत लगेचच त्यांच्या ताब्यात आले. त्याबरोबर अमेरिकेकडून मिळालेली करोडो डॉलरची अत्याधुनिक शस्रास्त्रेही आयतीच ‘इसिस‘च्या हाती पडली. त्यानंतर आधी केवळ प्रादेशिक असलेल्या शिया-सुन्नी युद्धाचे झपाट्याने आंतरराष्ट्रीय युद्धात रुपांतर झाले.
बैरुतमधील अमेरिकी विश्वविद्यालयातील एडवर्ड सैद विभागाच्या अध्यासनपदी असलेल्या विजय प्रसाद यांचे मत अगदी याविरुद्ध आहे. (*6) त्यांच्या मते, ‘इसिस‘चा जन्म सीरियातील यादवी युद्धामुळे नव्हे, तर अमेरिकेच्या सैन्याने इराकवर केलेल्या कब्ज्यामुळे झाला आहे. पण मी वाचलेल्या त्यांच्या लेखामध्ये फक्त या उल्लेखाखेरीज इतर कुठलेही स्पष्टीकरण मला दिसले नाही.
आणखी एक लेखक टेरेन्स मॅक्कॉय (*7) म्हणतात, की इराकमधील ‘कॅम्प बुक्का‘सारख्या तुरुंगामध्ये अमेरिकेने मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना खूप काळ एकत्र कैदेत टाकल्यामुळे ‘इसिस‘चा जन्म व वाढ झाली. कारण, त्यांना एकत्र राहू देत, आपसांत चर्चा करू दिल्यामुळे एक नवे व एकसंध नेतृत्व उदयास आले. याच नेतृत्वाने ‘इसिस‘ची स्थापना केली.
मॅक्कॉय लिहितात, की 2009 च्या मार्चमध्ये ‘कॅम्प बुक्का‘ या कुविख्यात तुरुंगातून शेकडो कैद्यांना सोडून देण्यात आले. अनेक वर्षे बंदिवासात असलेल्या कैद्यांचे नातेवाईक तुरुंगाबाहेर आनंदात जल्लोष करत होते; तर त्याच वेळी तुरुंगाचे अधिकारी मात्र चरफडत, धुसफुसत होते. कारण हे कैदी अतिशय खतरनाक होते आणि तुरुंगातून सुटल्यानंतर ते पुन्हा दहशतवादी कारवायांना सुरवात करणारच, याची त्यांना कल्पना होती. इराक सरकारला मात्र तशी स्पष्ट कल्पना नव्हती.
या तुरुंगात वेगवेगळ्या वेळी डांबलेल्या सुमारे एक लाख कैद्यांमध्ये ‘इसिस‘चा भावी म्होरक्या अबू बक्र अल बगदादीसारख्या नेत्याला आणि इतरही नेत्यांना एकत्र डांबून ठेवण्यात आले होते. तिथे त्यांना इतर साधारण कैद्यांना जहालमतवादी बनविण्याची संधी मिळाली आणि परस्पर सहकार्याने काम करण्याची शिकवणही देता आली. त्यातूनच आजची ही जिहादी शक्ती उभी राहिली.
या तुरुंगात यायच्या आधी अल बगदारी आणि त्याच्यासारखे इतर कैदी फक्त ‘हिंसक दहशतवादी‘ म्हणून ओळखले जात व त्यांना एकमेव तीव्र इच्छा होती ती अमेरिकेवर हल्ला करण्याची. पण तुरुंगातील वास्तव्यामुळे त्यांच्यातील उग्रवादाला खतपाणी मिळाले आणि त्यांना अनेक अनुयायीही मिळाले. असे तुरुंग जणू दहशतवादी घडविण्याची विश्वविद्यालयेच बनली. तिथे आधीच कट्टर व उग्रवादी असलेले कैदी प्राध्यापकाचे काम करत आणि इतर सामान्य कैदी ‘विद्यार्थी‘ या नात्याने प्रशिक्षण घेत. तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना होती; पण त्यांनी आपली भूमिका ‘गैरहजर पालकां‘सारखी ठेवली.
हे इतरत्रही घडलेले आहे. उदाहरणार्थ, केवळ आपल्या त्वचेच्या रंगावरून स्वत:ला श्रेष्ठ समजणारे अमेरिकी तुरुंगात घडविलेले गेलेले गौरवर्णीय किंवा 1970 च्या दशकात ब्रिटिश तुरुंगात डांबलेले आयरिय रिपब्लिकन आर्मीचे सदस्य! हे सारे तुरुंग स्फोटक उग्रवाद्यांना एकत्र ठेवून एका ठिणगीची वाट पाहणाऱ्या जागाच बनले. जणू कैद्यांना एकत्र ठेवून त्यांनी एक प्रेशर कुकरच विस्तवावर चढविला होता. 2006-07 मध्ये हे तुरुंग अल बगदादीसारख्या हजारो कैद्यांनी भरून वाहत होते. अमेरिकेवर हल्ला केल्यामुळे किंवा कटामुळे त्यातले काहीजण तुरुंगात डांबले गेले होते. पण कित्येक कैदी केवळ संशयावरून अटकेमध्ये होते. अशा घटनांच्या आसपास एखादा धट्टाकट्टा तरुण संशयास्पदरित्या उभा दिसला, तरीही त्याला तुरुंगात डांबले जाई. त्यामुळे अनेकांना ही न्यायाची कुचेष्टाच वाटे. कारण या कैद्यांवर कुठलेच आरोप नव्हते वा त्यांच्याविरुद्धचा पुरावाही त्यांना पाहायला मिळत नसे. ‘यांना सोडल्यास मुक्त दहशतवाद्यांची संख्या वाढेल‘ या एकाच कारणावरुन त्यांना कैदेत ठेवले जाई.
अन् झालेही तसेच! 2007 मध्ये अमेरिकेने आपल्या फौजेत वाढ केली, त्यावेळी हा तुरुंग 24 हजार कैद्यांनी भरून वाहत होता आणि वातावरण उग्रवादाने धुमसत होते. येथील तणाव कमी करण्यासाठी इथले कैदी त्यांच्या पंथानुसार विभागले होते. हे कैदी आपापसांतील भांडण-तंटे मुस्लिम कायद्यानुसार सोडवत असत. येथील कट्टरवाद इतका भिनला होता, की कुण्या कैद्याने मुस्लिम कायद्याबाहेर वर्तन केले, तर हे कैदी त्याला पांगळे करत वा ठारही मारत. शरिया पद्धतीने चालणारी ही न्यायालये तुरुंगाच्या सीमेत अनेक नियम लादत असत. जे कैदी पाश्चात्य पद्धतीने वागत, त्यांना हे कट्टरवादी अतिशय कठोर शासन करत आणि अशा पद्धतीने या कैद्यांवर कट्टरवादी बनण्यासाठी एका तऱ्हेचे सामुदायिक दडपण आणले जाई. साहजिकच, मग हे कैदी कट्टरवादी बनत.
पण ‘बुक्का‘ येथे एक सोय म्हणून अशी काही परिस्थिती निर्माण झाली, की सद्दाम हुसेन यांच्या ‘बाथ‘ पक्षाचे निधर्मी कैदी आणि इस्लामी मूलतत्ववादी तिथे एकत्र आले आणि एक झाले. गंमत म्हणजे, कैद्यांचे हे वरील दोन गट परस्परांना पूरक बनले. ‘बाथ‘ पक्षाच्या कैद्यांकडून जिहाद्यांना लष्करी शिस्त, संघटनात्मक कौशल्य शिकायला मिळाले; तर या जिहाद्यांकडून ‘बाथ‘च्या कैद्यांना उद्दिष्ट, ध्येय यांचा परिचय झाला. या तुरुंगांना एकेकाळी ‘अल कायदाच्या शाळा‘ असे म्हटले जाई आणि या ‘शाळां‘मधूनच प्रशिक्षित झालेल्या नव्या कट्टरवादी लढवय्यांनीच पुढे ‘इसिस‘ची उभारणी केली. 2009 मध्ये हे कैदी मुक्त करण्यात आले आणि ते बगदादला आले, तेव्हा जणू त्यांची दोनच उद्दिष्टे होती.. साऱ्यांनी जहालमतवादी बनणे व सूड घेणे!
रशिया या युद्धामध्ये पडण्याच्या आधीची ‘इसिस‘च्या फौजा व सीरिया-इराक सरकारच्या फौजा यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाची परिस्थिती नकाशा क्रमांक 6 मध्ये दाखविलेली आहे.
नकाशा क्रमांक 6:
............................................................................................................
टिपा :
(*1) : ‘अल शाम‘ म्हणजे उत्तरेकडील प्रदेश. हे सीरियाचे पूर्वीचे नाव आहे.
(*2) : लेव्ही व स्कॉट क्लार्क या लेखकद्वयींच्या ‘न्यूक्लिअर डिसेप्शन‘ या मूळ इंग्रजी पुस्तकाचे ‘पाकिस्तानी अणुबॉम्ब : एक घोर फसवणूक‘ हे मी केलेले रुपांतर आहे. या पुस्तकाच्या 19 व्या प्रकरणामध्ये अल झरकावी व त्यांचे सहकारी मक्दिसी यांच्या मुलाखतीवर आधारित फुआद हुसेन या जॉर्डनच्या एका पत्रकाराने लेख लिहिला आहे. यात सर्व जगावर मुस्लिम वर्चस्व स्थापण्याच्या त्यांच्या पाच टप्प्यांच्या बेतांबद्दल खूप सविस्तर आणि वाचनीय माहिती आहे. त्यातला काही भाग :
पहिला टप्पा होता ‘जागृती‘. या टप्प्यात सापाच्या डोक्यावर वार करून त्याला असंघटित प्रतिहल्ला करण्यास प्रोत्साहन देणे. हा टप्पा 2000 ते 2003 च्या दरम्यान घडला होता आणि त्यात अमेरिकेच्या सैनिकांवर, जहाजांवर, दूतावासांवर हल्ले करत करत् 9/1 च्या मोठ्या हल्ल्यात त्या टप्प्याचा नेत्रदीपक शेवट झाला होता आणि हा टप्पा यशस्वीरित्या पार पडला, असाच निर्वाळा जाणत्यांनी दिला. या हल्ल्यामुळे डिवचली गेलेली अमेरिका प्रतिहल्ला करण्यासाठी मध्य-पूर्वेत ओढली गेली होती आणि त्यामुळे अमेरिकी लक्ष्ये जवळ आली आणि सोपी झाली. आता ‘अल कायदा‘ला जणू श्रोतृवर्ग लाभला होता.
दुसऱ्या टप्प्याचे नाव होते ‘डोळे उघडणे‘. 2006 मध्ये संपलेल्या या टप्प्याचे उद्दिष्ट होते अमेरिकाविरोधी चळवळीची शियाविरोधी बंडात विस्तृती होणे. अल झरकावीच्या या योजनेला ओसामाचीही संमती मिळाली. या टप्प्यात ‘अमेरिका आणि युरोपीय देश मुस्लिमविरोधी आहेत‘ असा आभास निर्माण करणे हेही उद्दिष्ट होते. हा टप्पादेखील यशस्वी झाला होता.
हे पाकिस्तानसारख्या देशात दिसू लागले होते. कारण मुस्लिम देशवासियांना व्हिसा देण्याबाबतचे निर्बंध कडक झाल्यामुळे सुखवस्तू मुसलमानांनाही आपला देश सोडणे कठीण होऊ लागले होते. त्यामुळे मुस्लिम पैसा पाश्चात्य देशांत यायच्याऐवजी पाकिस्तानसारख्या देशांत परत जाऊ लागला. बॅंकांना वैभव आले, स्थावर वास्तूंचे भाव वाढले, इस्लामचे पुनरुत्थान झाले आणि पाकिस्तानचा पश्चिमेकडे कलणारा मध्यमवर्ग मशिदींकडे वळला. श्रीमंत व्यवसायी लोक मदरसे आणि तत्सम सेवाभावी संस्थांमध्ये जाऊ लागले. भयामुळे आणि तिटकाऱ्यामुळे सर्व स्तरांतील पाकिस्तान्यांना बाजू निवडणे आवश्यक बनले आणि उच्चभ्रू समाज-लष्करातील कंपूच नव्हे तर पाकिस्तानचा अणुप्रकल्प चालविणारे सुशिक्षित शास्त्रज्ञही इस्लामकडे आणि पाश्चात्यांच्या विरुद्ध झुकले.
या पुस्तकातील तिसरा टप्पा ‘उठणे आणि उभे राहणे‘ हा होता. मध्य-पूर्वेतील कुठल्याही राष्ट्राने सत्ता गमावली, तर त्याचा फायदा घेण्यासाठी ‘अल कायदा‘ने तयार असले पाहिजे, असा विचारही त्यात होता. सीरिया हे जरी सुन्नी राष्ट्र असले, तरीही राजनैतिक कारणांसाठी इराणच्या शियांबरोबर उभे होते. पण तिथली मुस्लिम सनातनी जनता बशर अल असाद यांची हुकूमशाही संपविण्याच्या संधीचीच वाट पाहत होती. लेबॅनॉनचेही तुकडे पाडायचे होते. या सर्व देशातल्या आणि जॉर्डनच्या सुन्नींना एका उद्देशासाठी एकत्र आणणे जरुरीचे होते.
2010 पासून तीन वर्षे ‘अल कायदा‘ चौथ्या टप्प्यात शिरणार होता. (हे पुस्तक 2007 मध्ये प्रसिद्ध झाले आहे. एव्हाना शिरलाही असेल) तोवर नावडत्या, तिरस्कृत अरबी सरकारांचा पाडाव झालेला असेल, असा लेखकाचा होरा होता. (वास्तविक, अद्याप असे झालेले नाही.) या काळात डॉलरऐवजी सोने हे चलन वापरून जागतिक आर्थिक परिस्थितीला धक्का लावण्यासाठी अरब तेल जाळण्याची त्यांची योजना होती. तसेच, सायबर-दहशतवादही सुरू करण्याची योजना होती. तोवर अमेरिका बरीच कमकुवत होऊन ‘सुपरपॉवर‘ उरलेली नसणार आणि आपल्या ‘कोशा‘त गेलेली असेल व इस्राईल स्वत:चे संरक्षण करू शकणार नाही. 2013 पर्यंत ही परिस्थिती आली, की योजना पाचव्या टप्प्यात जाऊ शकेल आणि एका इस्लामी राजवटीची घोषणा करता येईल. इस्लामी जगतात पाश्चात्यांचा पगडा कमकुवत झाल्यामुळे ‘अल कायदा‘च्या विचारांना विरोध राहणार नाही आण्इ त्यातून संपूर्ण शक्तिनिशी टक्कर‘ हा टप्पा सुरू होईल. हा ‘काफिरां‘विरुद्धचा शेवटचा आणि प्रलयंकारी संघर्ष असणार होता. यात नरसंहाराची सर्व आण्विक, रासायनिक आणि जैविक अस्त्रे वापरून संपूर्ण हुकूमत मिळवून जागतिक खिलाफतीची स्थापना करण्याची योजना होती. कुराणातील एक उल्लेख करून हुसेन लिहितात, की आता सत्याचे आगमन झाले असेल आणि असत्याचा विनाश. कारण, असत्याचा साहजिकच विनाश होणार. आम्ही शत्रूला घाबरवून सोडू आणि त्याला पळवून लावू!‘ 2020 पर्यंत सारे जग 150 कोटी मुसलमानांच्या मालकीचे असेल.
(*3) : याच पुस्तकात अल झरकावीच्या शियापंथीयांच्या योजनाबद्ध शिरकाणांची सविस्तर माहिती आहे. मी रुपांतर केले आहे, म्हणून म्हणतोय असे नाहीए; पण त्यातील माहितीच्या आधारावरून मी असे नक्की मानतो, की ‘न्यूक्लिअर डिसेप्शन‘ हे मूळ इंग्रजी पुस्तक अथवा मी रुपांतर केलेले ‘पाकिस्तानी अणुबॉम्ब : एक घोर फसवणूक‘ हे त्याचे मराठी रुपांतर प्रत्येक भारती, अमेरिकी आणि पाकिस्तानी नागरिकाने वाचावे, इतकी सविस्तर आणि अतिशय उपयुक्त माहिती त्या पुस्तकात आहे.
(*5) : अली खेदेरी हे ‘ड्रागोमान पार्टनर्स‘ या युद्धविषयावरील सल्लागार संघटनेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी इराकस्थित पाच अमेरिकी राजदूतांचे खास सहायक म्हणून काम पाहिले आहे. अमेरिकी लष्कराच्या युरोपस्थित ‘सेंटकॉम‘च्या तीन प्रमुखांचे 2003 पासून 2010 पर्यंत ज्येष्ठ सल्लागार म्हणून काम केलेले आहे. इराकमध्ये काम केलेल्या अमेरिकी अधिकाऱ्यांत त्यांनी सातत्याने सर्वांत जास्त काळ काम केलेले आहे.
(*6) : विजय प्रसाद हे बैरुतमधील अमेरिकी विश्वविद्यालयातील एडवर्ड सैद विभागाच्या अध्यासनपदी आहेत. त्यांनी आजवर ‘The Poorer Nations: A Possible History of the Global South‘ व ‘Arab Spring, Libyan Winter‘ सारखी पुस्तके लिहिली आहेत.
(*7) : टेरेन्स मॅक्कॉय हे ‘वॉशिंग्टन पोस्ट‘ या अमेरिकी वृत्तपत्राचे वार्ताहर असून त्यांच्या How the Islamic State evolved in an American prison या लेखातील काही माहिती इथे वापरली आहे.