Saturday, January 30, 2016
घसरत्या तेलदराचं राजकारण (धनंजय बिजले)
अर्थनीतीच्या भूमितीत अडकलेला भारत (संदीप वासलेकर)
Monday, January 25, 2016
Rohit vemmula
रोहित वेमुला यास,
तुला अनावृत्तपत्र लिहायचे कारण तुलाही पक्के ठाऊक असेलच. ज्याला उद्देशून असे पत्र लिहीले जाते त्याने ते वाचू नये, पण इतरांनी अगत्याने वाचावे, म्हणून लिहीतात, त्यालाच अनावृत्तपत्र म्हणतात ना? तुझे आत्महत्येपुर्वीचे पत्रही असेच होते. ते कोणी कोणी वाचले हे बघायला तू हयात कुठे होतास? पण कित्येक लोकांनी ते वाचले आणि ज्यांना ते जमणार नव्हते, त्यांना माध्यमातील नामवंतांनी वाचून दाखवले. अर्थात अशा पत्रातले काय आपल्या सोयीचे असेल, तितकेच वाचले वा वाचून दाखवले जात असते. तुझे पत्रही त्याला अपवाद नव्हते. सहाजिकच त्यातले शब्द वाक्ये वा उतारे प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार वाचले वा इतरांना वाचून ऐकवले. कारण तू आत्महत्या केली होतीस आणि तुला काय म्हणायचे होते वा नव्हते, त्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी तू हयातच कुठे होतास? म्हणून तर तुझ्या त्या पत्राला बाजारात प्रचंड किंमत आली. अन्यथा मुठभर लोकांनीही त्याकडे ढुंकून बघितले नसते. तू हयात असताना काय आणि किती लिहीत बोलत होतास. पण त्यातल्या कुठल्या शब्दांची कोणी दखल घेतली का? इतरांना वाचून दाखवणे दूर, आज उर बडवणार्या कोणीही तेव्हा तुझ्या शब्दांकडे वळून बघण्याचेही कष्ट घेतले नव्हते. पण आज तुझ्या शब्दांना राजकीय प्रसिद्धीच्या बाजारात तेजी आली आहे, म्हटल्यावर तुकडे पाडून वा वाटे घालून त्या पत्राचा व्यापार जोरात चालला आहे. ज्यांच्या सोयीने शब्द त्यात नाहीत, त्यांनी तुझ्याच जुन्यापान्या शब्द वा लेखनाचे उत्खनन चालविले आहे. यातल्या कोणालाही त्या शब्द वा त्याच्या मतितार्थाशी काडीमात्र कर्तव्य नाही. प्रत्येकाला आपापला उल्लू सीधा करण्यासाठी त्यातला वाटा हिस्सा हवा आहे. मृतदेहाभोवती घिरट्या घालणारी, गर्दी करणारी गिधाडे असावित, तशी तुझ्या आत्महत्येभोवती कशी झुंबड उडाली आहे बघ. तुझ्या बलिदानाला केविलवाणे करून टाकले या लोकांनी!
ज्यांना आपला युक्तीवाद किंवा इझम पुढे न्यायचा असतो, त्यांच्या बाजारात यापेक्षा काहीच वेगळे होत नसते रोहित! म्हणूनच त्यांना हुतात्मे शहीद हवे असतात. मग दाभोळकर, कलबुर्गी सापडला तर ते आनंदित होतात. त्याच्या वेदना यातनांकडे ढुंकूनही न बघता असे बाजारू ‘सेल्फ़ी’ घेण्यासाठी त्याच्या भोवती झुंबड करतात. आताही हैद्राबादच्या त्या विद्यापिठात किती वर्दळ सुरू झाली आहे बघतो आहेस ना? दूर दिल्ली वा कोलकात्यातून येणारे डावे, पुरोगामी सोड, त्याच तुझ्या विद्यापिठातले विविध प्राध्यापक अधिकारीही कसे सरसावून पुढे आलेत बघ. यांना तर रोहित वा त्याच्या संवेदना कित्येक महिने वर्षापुर्वी दिसू शकत होत्या ना? मग तू निराश हताश होऊन घुसमटत होतास, तेव्हा यातला कोणी खांद्याला खांदा लावून कधीच कसा उभा राहिला नाही रे? आता म्हणे त्यातल्या अनेकांनी आपापल्या अधिकारपदाचे राजिनामे दिलेत. नित्यनेमाने आवारात धरणी चालू आहेत. भाषणे व घोषणा चालू आहेत. दुसरीकडे ज्यांना तुझ्या आत्महत्येचे गुन्हेगार ठरवले जाते आहे, त्यांनीही यापुर्वी रोहितने काय लिहीले, ते शोधून संशोधन करून जगापुढे आणत आहेत. कोणी तुझ्या जन्मजातीचा शोध घेतला आहे, तर कोणी तुझ्या वंशावळीचा शोध घेऊन नवनवे सिद्धांत मांडत आहेत. त्यात मग मार्क्सवादी वा पुरोगाम्यांसह चळवळीच्या बाबतीत तूझा कसा भ्रमनिरास झालेला होता, त्याचे दाखले दिले जात आहेत. पण तिकडेही बघायला कुणा पुरोगाम्याला वेळ नाही. सहाजिकच आहे. ज्यांना बळी वा शहीद हवा आतो, त्यांना त्याच्या शब्द भावनांशी काय कर्तव्य असणार? पण त्यांच्या अशा मतलबाला शह देण्यासाठी दुसर्या बाजूला आपला बचाव मांडताना तुझ्या जुन्या शब्दांचे शोध घ्यावे लागत आहेत. मात्र शब्दात आशय कोणता आहे किंवा त्यातून रोहितची मनोव्यथा काय आहे, याविषयी संपुर्ण अलिप्तता आहे.
हेच होत आले आजवर रोहित! कुठल्याही विचारसरणी वा तत्वज्ञानाने मानवी कल्याणाचा व उत्थानाचा गजर खुप केला, पण त्यातली माणुसकी कुठल्याच तात्वज्ञानाला कधी उमजली नाही. आजही बघतोस ना? फ़ुले, शाहू आंबेडकरांच्या नावाचा सगळीकडे किती उदघोष चालू असतो. पण त्यांनी सांगितलेल्या लिहीलेल्या शब्दांचा आशय कोणी थोडातरी समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे काय? अशा महात्म्यांच्या नावाचा नामजप अखंड करणार्यांना त्यातल्या आशयाची काडीमात्र किंमत नसते. कारण त्या आशयाला, भूमिकेला वा मतितार्थाला बाजारात मूल्य मिळत नाही. बाजाराचे एक सुत्र असते. आपला माल विकण्यासाठी व त्याकडे ग्राहकाला ओढून घेण्यासाठी उत्तम जाहिरात आणि झकास पॅकिंग आवश्यक असते. त्यासह नजरेत भरणारे एक मॉडेल शोधावे मिळवावे लागते. वर्षानुवर्षे उलटून जातात, पिढ्यानुपिढ्या तोच माल विकला खपवला जात असतो. बदलत असतात, ती मॉडेल्स, जाहिराती किंवा पॅकिंग! पन्नास वर्षापुर्वी कोकाकोला किंवा कुठला सौंदर्य साबण तेव्हाच्या नट्या विकत असायच्या. आज कोणी मधूबालाकडून साबणाची करून घेत नाही, की पेप्सी विकायला आता कुणी अझरुद्दीनला झळकवत नाही. सचिनही मागे पडलाय. आता तोच लक्स साबण दिपीका पदुकोणच्या सौंदर्याचे रहस्य असतो. ग्राह्काला त्यातच मधूबालाच्या सौंदर्याचे रहस्य असल्याचा थांगपत्ता नसतो. तसा तू मॉडेल झालास रे रोहित! कालपर्यंत दाभोळकर, कलबुगी, पानसरे यांचा वापर झाला आणि आता रोहित हाती लागलाय. कोण कशाला संधी सोडणार ना? अरे तुझ्या जन्मदात्या मातापित्यांनाही आपले अश्रू खोटे वाटतील, इतका टाहो फ़ोडला जातोय. बाजार गरम आहे रोहित! दादरीच्या अखलाख महंमदचाही जमाना होता सहा महिन्यापुर्वी! आज त्याची आठव्ण कोणा रडवेल्या व्यापार्याला राहिली आहे काय? सहा महिन्यांनी रोहितही कुणाच्या स्मरणात नसेल.
हा पुरोगामी बाजार आहे रोहित! इथे बाजारातील तेजीमंदीविषयी संवेदनशीलता महत्वाची असते. दाभोळकर कलबुर्गी वा अखलाख दुय्यम असतात. कालपरत्वे त्यांची महत्ता संपुष्टात येते. विकायचा माल महत्वाचा असतो. त्यासाठी मॉडेलसारखे शहीद वा बळी हवे असतात. कधी पुण्यातला सॉफ़्टवेअर इंजिनीयर मोहसिन तेजीत येतो आणि मग विस्मृतीत गायब होतो. तर कधी अखलाख तेजीत येतो. आज तुझ्या आत्महत्येला बाजारात तेजी आहे. माझे शब्द तुला क्रुर वाटतील रोहित! पण समोर बघ, सहा महिन्यापुर्वी दाभोळकर, कलबुर्गी, अखलाखच्या नावावर आपापले पुरस्कार माघारी देण्याचे ‘बलिदान’ करणारे महात्मे आता तुझ्या आत्महत्येच्या मुहूर्तावर तेच पुरस्कार परत घ्यायला सज्ज झाल्याची बातमी आहे. त्याचा अर्थ इतकाच, की तेव्हाच्या त्या बळींचा शेअर उतरला आहे. बाजार भयंकर क्रुर असतो रोहित! भावनेला वा संवेदनेला तिथे किंमत नसते. संवेदनाशील शब्द ही जाहिरात असते आणि शहीद गेलेला बळी हे मॉडेल असते. पुरोगामीत्व ही आजकाल राजकीय सामाजिक बाजारात मॅगीसारखी उपभोग्य वस्तू झाली आहे. मॅगीसारखे फ़ास्टफ़ुड! फ़ेअर एन्ड लव्हलीसारखे चार दिवसात गोरेपण बहाल करणारे रसायन म्हणजे पुरोगामीत्व आहे रोहित! त्यातून खरेच समाजातला अन्याय नष्ट होईल वा सामाजिक समता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा कशी बाळगता येईल? तात्पुरते समाधान मिळण्यावर ग्राहकाने खुश व समाधानी व्हायचे असते. तोच कुठल्याही बाजाराचा नियम असतो. अरे समता खरेच प्रस्थापित झाली, तर पुरोगामीत्वाचा बाजार गुंडाळून बंद करावा लागेल ना? मग झेंडे कुठले मिरवायचे? तुझ्या आत्महत्येचे दु:ख तेवढ्यासाठी आहे. आपण कशासाठी आहुती देतोय आणि कोण त्याचा फ़ुकटात मॉडेल म्हणून वापर करून आपले धंदे तेजीत घेऊन जातील, याची सुतराम कल्पना तुला नव्हती, याचे दु:ख होते. पण आता काय उपयोग? व्हायचे ते होऊन गेले ना? व्यापारी लौकरच पुढल्या अखलाख, रोहित वा कलबुर्गीच्या प्रतिक्षेत दिसतील. व्याकुळलेले तुझे मुठभर आप्तस्वकीय सोडून अन्य कुणाला तुझे शब्द तेव्हा आठवणारही नाहीत....
©® भाऊ तोरसेकर
Sunday, January 17, 2016
मरतुकडी गाय-उल्हास हरी जोशी,
Monday, January 11, 2016
तणाव...!!
................
स्मृती इराणी या खरे तर वादग्रस्त मंत्री. त्यांच्या जवळपास प्रत्येक वक्तव्याबाबत वाद झाले आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात जेव्हा, ‘आठवीपर्यंतच्या मुलांना नापास न करण्याचे धोरण बदलण्याचा सरकारचा विचार आहे,’ अशा आशयाचे विधान त्यांच्याकडून ऐकले तेव्हा सुखद धक्का बसला. आठवीपर्यंत नापास करायचे नाही, म्हणजे त्याचे मूल्यमापनही करायचे नाही, असा अर्थ काही शाळांनी घेतला की काय कोणास ठाऊक. मुलांनी मात्र शिक्षण न घेता वरच्या वर्गात जाण्याचा परवाना मिळाल्यासारखे वागायला सुरुवात केली. आज आठवीत गेलेल्या सामान्य मुलाला खरोखरच काय येते याचा आढावा घेतला तर धक्कादायक बाबी उघड होतात. अर्थात याला दुसरी बाजूही आहे. ही मुले जर इतकी ‘ढ’ असतील तर मग शिक्षक काय करत होते, त्यांना शिकविण्याचे काम शिक्षकांचे नाही का, असा प्रश्न विचारला जातो. तो काही अंशी खराही आहे. शाळेत जाऊनही शिकायची इच्छा नसणारे मूल शोधून सापडणारे नाही. मग त्याची अशी अवस्था का व्हावी? या सगळ्यात विरोधाभास असला तरी आठवीपर्यंत नापास न करण्याच्या निर्णयाने मुलांचे शैक्षणिक नुकसानच झाले हे नाकारून चालणार नाही.
शिक्षणहक्क कायद्याखाली विद्यार्थ्याचे सतत आणि सखोल मूल्यमापन व्हावे, एकदोन परीक्षांच्या आधारे त्याची ‘लायकी’ ठरविली जाऊ नये, अशा भूमिकेतून हे धोरण आणण्यात आले होते. त्याचा हेतू चांगला होता. परंतु, काही मुलांनी आणि शाळांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला. नापास होणार नाही, मग निकालाच्या तणावाखाली कशाला राहायचे, असा विचार काही विद्यार्थ्यांनी केला. काही शिक्षकांनाही हे सततचे मूल्यमापन जाचक वाटायला लागले. आधीच सरकारने भरपूर कामाला लावले आहे, त्यात हे वाढीव काम कशाला असा दृष्टिकोन झाला. त्यातून ही योजना फसत गेली. सगळ्यांनीच असा चुकीचा अर्थ घेतला असे नाही, पण ज्या सामूहिकरीत्या ही योजना राबवायला हवी होती, ती तशी राबविली गेली नाही, हे खरे. महाराष्ट्रातही हीच परिस्थिती निर्माण झाली. आपल्याकडे दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे सर्वात मोठे ओझे आहे, असे समाजाने आणि शैक्षिणिक व्यवस्थेने ठरविल्यामुळे वेगळेच प्रश्न निर्माण झाले. या वर्षी, मार्च परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याची परीक्षा लगेच उरकून घेतली गेली हे बरे झाले. नाही तर एकदा का नावावर नापासाचा शिक्का बसला की मग त्यातून सावरणे विद्यार्थ्याला फार कठीण जाते. त्याच्या मनावरचे ओझे वाढवायला पालक, नातेवाईक आणि समाज असतोच. याही बाबतीत काही ठोस निर्णय घ्यावा लागेल.
***
भारतात प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाइल दिसत असले आणि इंटरनेटचा वापर सतत वाढत असल्याचे म्हटले जात असले तरी खऱ्या अर्थाने इंटरनेट क्रांती अजून पूर्णपणे झालेली नाही. तरीही बँकिंग क्षेत्रात पेमेंट बँकांना परवानगी दिल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. या पेमेंट बँकांचे काम काय असणार, त्या बँक व्यवहारांशी जवळीक नसणाऱ्या सामान्य माणसाला फायदेशीर कशा आहेत, वगैरे बातम्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रश्न एवढाच आहे की आतापर्यंत ज्या बँका ग्राहकाला राजा मानत नव्हत्या, त्या बँकांचा कारभार यामुळे सुधारणार आहे की नाही? १९६९ साली बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले आणि या बँका भारतीयांच्या पैशाच्या जणू एकमेव आशास्थान बनल्या. परंतु, नंतरच्या काळात, विशेषत: गेल्या दीड दशकात खासगी बँका आल्यावर आणि बऱ्याच ग्राहकांनी तिकडे मोर्चा वळविल्यावर राष्ट्रीयीकृत बँकांची अवस्था पार चांगली राहिलेली नाही. व्यवसाय कोणताही असो, आज ग्राहक हाच राजा झाला आहे. हे जो लक्षात घेत नाही, तो लवकर डबघाईला येतो.
या बँकांपुढच्याही काही अडचणी आहेत हे मान्य. अपुरा कर्मचारीवर्ग सारे काम हाताळायला आणि ग्राहकाचे समाधान करायला असमर्थ ठरत आहे. असंख्य निर्बंधांमुळे, खासगी बँकांमध्ये होत नसलेला नियमांचा बागूलबोवा इथे मात्र दिसतो, याचा अनुभव मी अनेकवेळा घेतला आहे. काम नियमाने व्हायला हवे हे मान्य, पण ग्राहकाचाही विचार व्हायला नको का? हे सारे फक्त पेमेंट बँकेनेच बदलेल असे नाही. त्यासाठी आणखी बरेच काही करावे लागेल. प्रशासन लोकाभिमुख करावे लागेल. नाहीतर इंटरनेटच्या आक्रमणामुळे टपाल खात्याची जी अवस्था झाली आहे, ती बँकांची व्हायला वेळ लागणार नाही. राष्ट्रीयीकृत असोत वा खासगी वा सहकारी, आज प्रत्येक बँक ग्राहकाने बँकेत न येता घरच्या घरी कम्प्युटरवरून अथवा मोबाइलवरून बँकेचे व्यवहार करावेत, यासाठी प्रोत्साहन देत आहे. अनेक लोकांना नेटबँकिंगची भीती वाटते. ती घालविण्याचे काम सुरू आहे. एकदा सारे व्यवहार ऑनलाइन झाले की बँक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकेल किंवा त्यांना अन्य कामात हलवावे लागेल. ऑनलाइनचा हा फटका प्रत्येक व्यवसायाला बसणार आहे. ते ओळखून सध्या बँकांमध्ये येणाऱ्या ग्राहकाला असमाधानी अवस्थेत परत पाठविले गेले तर बँकांवरच त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. १९६९च्या निर्णयाचे चक्र उलटे फिरविण्याची हीच वेळ आहे का?
***
एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू, असे आपल्या आयुष्यात बरेच वेळा होते. हा प्रकार गेल्या १५ दिवसांत खेळाच्या मैदानावर भारताला दोनदा अनुभवावा लागला. क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून झालेला पराभव वेदनादायी होता हे खरे, पण त्याहूनही अधिक वेदना देणारा होता तो सायना नेहवालचा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत झालेला पराभव. कोणत्याही पराभवानंतर त्याचे विश्लेषण करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, अशा थाटात प्रत्येक भारतीय वागत असतो आणि आपलेच कसे खरे आहे हे तावातावाने सांगतही असतो. भारतीय खेळाडू अंतिम फेरीपर्यंत जातात पण शेवटच्या सामन्यात हार पत्करतात. त्यांच्याकडे अंतिम घाव मारण्याचे कसब (किलर इन्स्टिंक्ट) नाही का, असा प्रश्न अनेकदा विचारला गेला. टेनिसमध्ये आपल्याकडे अमृतराज बंधू होते. त्यांची झेप एखादा अपवाद सोडला तर जेमतेमच होती. रामनाथन कृष्णन आणि रमेश कृष्णन हेही ग्रँड स्लॅमचे एकेरीचे मैदान कधी मारू शकले नाहीत. नंतर आलेल्या लिएंडर पेसने मात्र एकेरीत नाही तरी दुहेरीत उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. हे जसे टेनिसचे तसेच बॅडमिंटनचे. प्रकाश पदुकोण यांच्यानंतर सायनाच चमकली. पी. व्ही. सिंधूची कामगिरी सातत्यपूर्ण नाही. हेच इतर खेळाडूंबाबत होताना दिसते आहे. एखादा विश्वनाथन आनंद पुढे येतो, बाकीचे एका विशिष्ट
टप्प्यापर्यंतच जातात. म्हणजे प्रत्येक खेळातला राष्ट्रीय विजेता, जागतिक विजेता व्हायला जे अंगात असावे लागते ते बहुतेकांमध्ये नसते. सायनाचा याला अपवाद आहे. आजच्या घडीला ती जागतिक क्रमवारीवर पहिल्या क्रमांकावर आहे. यामुळेच तिच्या पराभवामुळे एका डोळ्यात आसू असले तरी दुसऱ्या डोळ्यात हसू आले.
टेनिसप्रमाणेच बॅडमिंटनमध्येही गेल्या पाच वर्षांत खूप नव्या ताज्या दमाच्या मुली आल्या आहेत. त्यांच्यामुळे या खेळातली स्पर्धा अधिकाधिक तीव्र झाली आहे. यामुळे सायनालाही आपला खेळ अधिक उंचावावा लागत आहे. सायना स्वत: अधिक तणावाखाली खेळत आहे, जागतिक स्पर्धेचा अंतिम सामना हा इतर कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीसारखा शांतपणे खेळायला हवा, असे प्रकाश पदुकोण म्हणत असले तरी जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश केलेल्या कोणत्याही खेळाडूला खूप तणाव येणार हे उघडच आहे. परंतु, अशा तणावाखाली खेळूनच जिंकणाऱ्या खेळाडूलाच विजेतेपदाचा चषक मिळतो हेही खरे आहे. सायनाला मन:पूर्वक शुभेच्छा!
द्रविडा'यन
Friday, January 8, 2016
गणपतीचा आशीर्वाद - मोदक स्पेशल
नेवेद्यासाठी आईने
खोबरे घेतले खोवायला
समोरच्या आमराईने
दिले तोरण दारालाआजच्या खोबर्यामध्ये असे
काय होते खास?
प्रसाद म्हणुन मिळणार होता
गोड मोदकाचा घासहळूहळू वितळू लागला
गूळ खोबर्या भोवती
निरांजनात मिठी मारून
बसल्या होत्या वातीश्वेत मुलायम समईमध्ये
भरले मोदकाचे सारण
धावणार्या नात्यांना लाभले
भेतावयाचे कारणअनोख्या शब्दांच्या आरत्या
पितळी झांजांची त्यांना साथ
गुणगान ऐकूनी प्रिय पुत्राचे
प्रसन्न झाले भोलेनाथदुर्वांकूर व जास्वंद
झाल्या मस्तकी विराजमान
पंचपक्वानांनी नटले
सुगरास केळीचे पानमुखी जेव्हा विरघळतो माझ्या
मोदकाचा हा प्रसाद
आभार त्या गणरायाचे
दिधला मोदकरूपी आशीर्वाद
माझं दैवत घरात
माझ्याच घरात,
आयुष्यभरासाठी
'आशीर्वाद' देण्यास.
काहीच कळेना,
विसर मनाला
लागलो वारीला.
झालो मी बारीक,
खर्चुनी घरचं धन
लागली मनास सल.
कपाळी बुक्का लावत
माझं दैवत घरात
मी निघालो वारीत.
पंढरी झाली-काशीलाही गेलो
मिसळलो मी वारीत
गुलाल खोबरे उधळत.
चुकले मनास
'वैभवाचं मंदिर'
त्यावर कळस.
सगळीकडं सहभाग,
सुखदुखात सोबत
"मना हिरवं रोपटं".
नयनी आसवे,
मन माझे
पोरके झाले.
मी निघत वारीत,
मी निघत वारीत
माझं दैवत घरात.
चांदण्यात फिरताना भाग २
“काय झालं स्मिता? गप्प गप्प असतेस?” तशी स्मिता रडायला लागली.
“अगं, मी फक्त त्याला लग्नाचं विचारलं होतं ना. कुठे गेला कळतंच नाही मला.” रडतच ती सांगत होती.
“मग त्याला फोन करायचा ना.”
“नाही वापरत तो mobile.”
“पहिलं तुझं रडणं थांबव आणि मला नीट सांग काय झालं ते.” स्मिताने डोळे पुसले, जरा शांत झाली ती व सांगायला लागली.
“तुला सांगितलं होतं ना तसं त्याला विचारलं मी लग्नाबद्दल. त्याने उत्तरच नाही दिलं. दुसऱ्या दिवशी सांगतो म्हणाला तेव्हापासून आज आठवडा झाला तरी तो मला भेटलाच नाही.”
“अगं उशिरा निघत असेल तो.”
“नाही गं. रोज एक तास तरी थांबते मी. नाहीच येत तो.”
“आणि mobile चं काय बोललीस?”
“तो म्हणायचा गावात रेंज नाही येत मग mobile कशाला वापरायचा. घरीही फोन नाही. गावातच सगळे नातेवाईक आहेत म्हणतो. कोणाशी बोलायचे असेल तर त्यांना सरळ
भेटायलाच जातो, असं म्हणाला तो.” दोघीही गप्प झाल्या.
“आता काय करायचं गं. पप्पा बोलले मी येऊ का गावात त्याची चौकशी करायला.”
“नको, पप्पांना नको बोलावू. मला वाटते तो ना चोर असणार. गावात असे खूप असतात गं फसवणारे. तो घाबरून पळाला असणार तू लग्नाचं विचारल्यावर. तरी आपण पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवूया हरवल्याची.”
“ठीक आहे. चल.” असं म्हणत त्या दोघी हॉस्पिटल पासून जरा लांब असलेल्या पोलिस स्टेशन मध्ये पोहोचल्या.
“ठीक आहे. फोटो आणला आहे का हरवलेल्या व्यक्तीचा?” तश्या दोघी एकमेकांकडे बघायला लागल्या.
“नाही. फोटो तर नाही आहे.” स्मिताची मैत्रीण म्हणाली.
“फोटो नाही. मग त्याला शोधणार कसा. बरं नाव आणि पत्ता तरी आहे त्या व्यक्तीचा.” पोलिसांचा पुढचा प्रश्न.
“त्याचं नाव आहे यश.”
“पूर्ण नाव सांगा बाई.”
“माहित नाही सर.”
“बरं, पत्ता?”
“तोही माहित नाही.”
तसा तो पोलिस त्यांच्याकडे बघायला लागला. “तुमच्या ड्रेस वरून तुम्ही शिकलेल्या वाटता आणि तक्रार नोंदवताना काय माहिती दयावी एवढं साधं माहित नाही तुम्हाला.”
दोघी शांत बसल्या. कोणास ठाऊक त्या पोलिसाला त्यांची दया आली.
“बरं, त्या यशला कोणी पाहिलं आहे का?”
“हं... हो मी बघितलं आहे.” स्मिता लगेच बोलली.
“तो बघा, त्या खोलीत आमचा स्केच artist आहे. त्याचं वर्णन करून सांगा त्याला. तो काढेल चित्र त्याचं. मग आम्हालाही बरं पडेल शोधायला. मी आता बाहेर जातो आहे, चित्र झालं कि तक्रार नोंदवून घ्या, आम्हाला भेटला तर तुम्हाला कळवतो.” असं म्हणून तो पोलिस निघून गेला.
स्मिता लगबगीने त्या रूम मध्ये गेली.
“मला सविस्तर वर्णन सांगा. तसं मी स्केच काढतो.” स्मिताने लगेच त्याचं वर्णन करायला सुरुवात केली आणि त्याने स्केच काढायला. अर्ध चित्र झालं असेल तसा तो मधेच बोलला.
“थांबा.”
“का? काय झालं?”
“तुम्ही “आधार” हॉस्पिटल मध्ये काम करता का?” त्या प्रश्नाने दोघीही दचकल्या.
“आणि तुम्ही नक्की डॉक्टरच असणार.”
“हो. आम्ही आधार हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहोत. पण तुम्हाला कसं माहित?”
“मग हे स्केच काढायची गरजच नाही.” असं म्हणत तो उठला आणि कपाटातून कसलीशी फाईल काढली.
“हि फाईल बघा. वेगळीच फाईल बनवली आहे मी.” फाईल उघडताच एक स्केच होतं. यशचचं.... अगदी हुबेहूब...!
“हाच.. हाच यश आहे.” स्मिता आनंदाने म्हणाली. तिच्या मैत्रिणीने तिला गप्प केलं आणि त्यालाच उलट प्रश्न केला.
“पण याचं स्केच तुमच्याकडे कसं?” तसा तो हसला.
“तुम्ही नवीन आहात वाटतं इकडे?”
“हो. आम्ही दोघीही ६ महिन्यापूर्वीच जॉबला लागलो.”
“मग बरोबर. तुम्हाला माहीतच नसणार.”
“काय ते?”
“बघा त्या फाईल मध्ये सगळ्या तक्रारी आहेत. ७ महिन्यापूर्वीच नवीन तक्रार नोंदवली एका महिला डॉक्टरने.”
“कोणी? संगीता नाव होतं का तिचं?”
“हो. संगीताच नाव होतं तिचं.”
“आणि पुन्हा विचार करा या ९ तक्रारीपैकी कोणीच नंतर विचारायला आले नाही. तुम्ही उगाच तक्रार करू नका.”
“पण, त्याचं काय झालं आणि कसल्या तक्रारी आहेत?”
“सगळ्याच्या तक्रारी तो हरवल्याच्या आहेत.”
“हे कसं शक्य आहे?”
“ते मला माहित नाही पण तुम्ही उगाच तक्रार नोंदवू नका.” स्मिताला तर काही कळतच नव्हतं. बऱ्याच वेळाने तिची मैत्रीण बोलली,
“‘मग तुम्ही शोध नाही घेतला त्याचा?”
“या ९ तक्रारी गेल्या १० वर्षातल्या आहेत. प्रत्येक वर्षी एक तक्रार आहे आणि हे पोलिस स्टेशन तसं नवीन आहे, चार वर्ष झाली फक्त. जुन्या पोलिस स्टेशन मधले सगळे अधिकारी, शिपाई त्यांची बदली झाली. इकडे आता सगळेच नवीन आहेत. त्यामुळे जुन्या तक्रारींचं तसं काही माहित नाही. पण आम्ही आल्यापासून ४ तक्रारी आल्या. त्याची तपासणी केली आम्ही तरी त्याचा काही पत्ता नाही लागला आम्हाला. आता एवढा माणूस जाणार कुठे? तरी मला वाटते तो चोर असावा. शहरातल्या मुलींना फसवत असावा आणि काम झालं कि पळून जात असेल. पुन्हा तिकडे घनदाट जंगल आहे. त्या जंगलातच तो लपत असेल कदाचित. आम्हाला permission नाही आहे जंगलात जाण्याची.नाहीतर गेलो असतो तिकडे पण. तुम्ही तसच करा. तक्रार करू नका. तुमचा पत्ता आणि फोन नंबर देऊन ठेवा. मी कळवतो काही कळल तर.” त्या दोघींना काय चाललंय ते कळतच नव्हतं.
“काही तरी नक्कीच गडबड आहे. मला तर वाटते.”
“काय?”
“तो खरंच चोर असेल गं.”
“अगं, मग तो पोलिसांना कसा भेटत नाही.”
“माझं डोकं गरगरायला लागलं आहे आता.”विचार करतच घरी पोहोचली ती. काहीच कळत नव्हतं तिला. अचानक तिला आठवलं त्याच्या ऑफिस मधून त्याचा पत्ता मिळू शकतो.
“काय नाव होतं कंपनीचं.. हा...Eco. तेच नाव होतं. त्याच्या बोलण्यातून एक-दोनदा ऐकलं होतं मी.” आठवून तिने दुसऱ्या दिवशी तिकडे जाण्याचा निर्णय केला. सकाळीच निघाली स्मिता त्याचं ऑफिस शोधायला. विचारत विचारत तिला कळल कि “Eco” नावाची एक कंपनी होती, शहरापासून थोडी अलीकडे. शेवटी पोहोचली एकदाची तिकडे. तिथे पोहोचल्यावर ज्याला त्याला विचारलं, त्यापैकी कोणालाच त्याची माहिती नाही. अगदी बॉसलाही. तिलाच सगळ्यांनी वेडयात काढलं. स्मिताला रडूच आलं. आता कुठे शोधू मी त्याला. रडत रडतच ती कंपनी बाहेर आली.
तेवढयात मागून “थांबा madam” असा आवाज आला.
वॉचमननी हाक मारली होती. “काय झालं madam? कशाला रडता. बसा इकडे. उनाचं बाहेर नका जाऊ. पाणी प्या.” स्मिता शांत बसली आणि पाणी पिऊन बरं वाटलं.
“काका, मी इकडे आले होते एकाला शोधायला. पण इकडे कोणालाच माहित नाही.”
“कोणाला?”
“यश नाव आहे त्याचं.”
“यश साहेब..” वॉचमन बोलला. तशी स्मिता आनंदाने उभीच राहिली.
“तुम्ही ओळखता त्याला? कुठे आहे आता तो?”
“माहित नाही madam. यश साहेब होते इकडे कामाला पण १० वर्षापूर्वी. नंतर कुठे गेले माहित नाही आणि इकडे मी सोडलो तर सगळेच नवीन आहेत.” या बोलण्याने स्मिताचा आनंद नाहीसा झाला.
“हा पण आमचे जुने साहेब त्याचा पत्ता आहे माझ्याकडे. त्यांनी यश साहेबांबरोबर काम केलं आहे. त्यांना माहित असेल.” ते ऐकून थोडीशी आशा पल्लवीत झाली स्मिताची. वॉचमन कडून पत्ता घेऊन ती पोहोचली शहरात. खूप शोधाशोध केल्यानंतर तिला सापडलं त्यांचं घर.
“हो. पण तुम्ही कोण?” आता त्यांना खरं तर सांगू शकत नाही.
“मी स्मिता, यशची मैत्रीण. तुम्ही ओळखता ना यशला.”
“तुम्ही प्रथम आतमध्ये या. मग बोलू आपण.” तशी स्मिता त्यांच्या घरात जाऊन बसली.
“हं... बोला आता. काय काम होतं तुमचं? आणि यशची कशी ओळख?”
“मी त्याच्या college मधली मैत्रीण आहे.” स्मिताला खोटंच बोलावं लागलं.
“खूप वर्षांनी आली मी भारतात. यशने त्याच्या ऑफिसचा पत्ता दिला होता मला. मी जाऊन आले तिथे. तर यशला तिथे कोणीच ओळखत नाही. वॉचमनने तुमचा पत्ता दिला म्हणून आले मी तुमच्याकडे.”
“यश Actually मलाही माहित नाही तो कुठे असतो सध्या.”
“म्हणजे?”
“तो होता माझ्या हाताखाली कामाला. चांगला होता. पण १० वर्षापूर्वी.”
“१० वर्षापूर्वी?”
“हो. मग अचानक कुठे गेला ते माहित नाही.”
“नक्की काय ते मला कळलं नाही सर.”
“तो अचानक जॉबला येईनासा झाला. नंतर काही तो आला नाही कधी.” सर बोलत होते.
“मग तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न नाही केला का?”
“केलेला. एक - दोनदा त्याच्या घरी जाऊन आलो. पण त्याच्या पप्पांनी सांगितलं कि त्यांनाही माहित नाही तो कुठे आहे ते.”
“तुमच्याकडे पत्ता आहे त्याचा?”
“आहे ना. ‘कुंभार’ गावात सरकारी क्वॉर्टर्स आहेत ना त्यापासून थोडयाच अंतरावर त्याचं घर आहे. ‘धर्माधिकारी’ नाव आहे घराचं.”
“अरे, माझ्या रूमच्या मागेच आहे घर वाटते.” स्मिता मनातल्या मनात बोलली.
“तरी तुम्हाला काय वाटत सर, कुठे गेला असेल तो?”
“तसं नक्की काही सांगू शकत नाही. पण तो हुशार होता. त्याला परदेशातून नोकरीच्या ऑफर सुद्धा आल्या होत्या. आम्ही काही त्याला सोडू दिलं नव्हतं आमचं ऑफिस. म्हणून तो परदेशात गेला असेल न सांगता आणि परदेशात जाणं त्याच्या कुटुंबाला सुद्धा मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांना देखील माहित नसेल ते. परंतू त्याच्या बायकोला माहित असेल कदाचित.”
“बायको?” स्मिता उडालीच.
“तशी बायको म्हणता येणार नाही. पण लग्न करणार होते ते लवकरच. मग तिच्या बरोबर तो गेला असेल.”
“काय... काय नाव होतं तिचं?”
“नाव... सरिता... हा.... सरिताच नाव होतं तिचं..... डॉक्टर होती ती. इकडे पुढे ‘आधार’ नावाचं हॉस्पिटल आहे ना तिकडे डॉक्टर होती ती. नंतर ती सुद्धा हॉस्पिटल मध्ये दिसली नाही.”
“बरं, Thanks Sir” असं म्हणत यशचा गावातला पत्ता घेऊन ती निघून आली. सगळंच काही विचित्र होतं. पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या तक्रारी आहेत. १० वर्षापूर्वी ऑफिस मध्ये, १० वर्षापूर्वी कामाला होता... बायको... काहीच नाही... कदाचित मग तो परत आला असेल परदेशातून.... कदाचित.