Saturday, January 30, 2016

घसरत्या तेलदराचं राजकारण (धनंजय बिजले)

तेलाचे कोसळणारे दर हा सध्या जागतिक राजकारणातला ज्वलंत मुद्दा ठरतोय. तेलदराच्या या युद्धात आता इराणचं आगमन झाल्यानं सौदी अरेबियापासून ते रशियापर्यंत सारे देश शह- काटशहाचं राजकारण खेळत आहेत. कच्च्या तेलाचे दर आगामी काळात असेच उतरते राहिले तर रशिया, सौदी अरेबिया हे देश तेलामुळं असलेलं त्यांचं जागतिक राजकारणातलं महत्त्वाचं स्थान गमावतील अशी शक्‍यता आहे. 

च्च्या तेलाचे भाव प्रति बॅरलला तीस डॉलरच्या खाली कोसळले आणि जागतिक शेअर बाजारात जणू भूकंपच झाला. शांघायचा शेअर बाजार, न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीटपासून ते मुंबईच्या दलाल स्ट्रीटला त्याचे तडाखे जाणवले. २०१४ च्या जूनमध्ये तेलाचा भाव प्रती बॅरल ११५ डॉलर्स होता. तेव्हापासून तो घसरू लागला. तरीही तो शंभर डॉलर्सच्या खाली येणार नाही, असं अनेक तज्ञ त्या वेळी ठामपणे सांगत होते. एक बॅरल तेल उत्पादन करायलाच किमान पन्नास डॉलर लागतात. त्यामुळं त्याच्या खाली तेलाचा दर येणं कोणालाच परवडणारं नाही, असं म्हटलं जात असे. यात काही अंशी तथ्य असलं तरी सध्या तेल पाण्यापेक्षाही स्वस्त मिळू लागलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. अवघ्या दीड वर्षात तेलाचे दर एक तृतीयांशनं कोसळले आहेत. याचे भले- बुरे परिणाम साऱ्या जगाला जाणवू लागले आहेत. तेलाची मोठी आयात करावी लागणाऱ्या आपल्या देशासाठी ही चांगली घटना आहे. मात्र तेलाचे भाव कोसळल्यानं तेल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर डोळेच पांढरे व्हायची वेळ आलीय. तेलावरच ज्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे अशा आखाती देशांना तसेच रशिया, व्हेनेझ्युएला, नायजेरिया आदी देशांना याचा जबर फटका बसायला लागला आहे. रशियात महागाई शिगेला पोचली आहे तर, व्हेनेझ्युएला, नायजेरियात तेलदरातल्या घसरणीनं सरकारच उलथून टाकलं आहे. तेलाच्या पैशावर पोसल्या गेलेल्या नायजेरियातील बोको हरामसारख्या दहशतवादी संघटनेलाही याचा फटका बसणार आहे. 

तेलाचे दर हा जागतिक राजकारणातला ज्वलंत मुद्दा बनला आहे. त्याच्या भोवती सारं राजकारण फेर धरू लागलंय. तेल दराच्या या घातचक्रात आता इराणचं आगमन झाल्यानं सौदी अरेबियापासून ते रशियापर्यंत सारे देश शह- काटशहाचं राजकारण खेळत आहेत. तेलक्षेत्रात निर्माण झालेल्या या परिस्थितीचा कधी भडका उडेल याचा नेम नाही, अशी स्फोटक परिस्थिती आहे. जागतिक सत्तासमतोल बदलविण्याची ताकद तेलामध्ये आहे. त्यामुळं दिवसेंदिवस संघर्षाची धार तीव्र होत जाणार आहे. कच्च्या तेलाचे दर आगामी काळात जर असेच घसरते राहिले तर रशिया, सौदी अरेबिया आपला सारा रुबाब, जागतिक राजकारणातलं त्यांचं महत्त्वाचं स्थान गमावतील अशी शक्‍यता आहे. 

मागणी व पुरवठा या बाजारातल्या सूत्रानुसार तेलाच्या किंमतीत चढउतार होतात. जागतिक अर्थव्यवस्था तेजीत असते तेव्हा तेलाची मागणी वाढते आणि दरही वाढतात. अशा वेळी तेल कंपन्या सर्व शक्तीनिशी तेल उत्पादन करतात. थोडे फार जास्त तेल शिल्लक रहावे हा त्यामागचा हेतू असतो. मात्र जेव्हा जगातच अर्थव्यवस्था धीम्या गतीने चालू लागले त्या वेळी एकूणच उत्पादनावर, क्रयशक्तीवर परिमाण होतो आणि तेलाचे दर घसरू लागतात. याचं बोलकं उदाहरण म्हणून २००८ मधल्या घटनांकडं पाहता येईल. जागतिक बाजारात त्या वेळी अमाप उत्साह होता, घरांची बांधकामं, किंमती वाढत होत्या. एकूणच जागतिक उत्पादन शिगेला पोचलं होते. त्या वेळी तेलाच्या किंमतीही झपाट्यानं वाढल्या. २००८ च्या जुलैमध्ये एका बॅरलचा दर १४३ डॉलर इतका विक्रमी पातळीला गेला होता. मात्र त्याचवर्षी १५ सप्टेंबरला लेहमन ब्रदर्स या अमेरिकेतल्या कंपनीचा डोलारा कोसळला आणि अमेरिकेला मंदीने ग्रासलं. त्याचे परिणाम साऱ्या जगावर व अपरिहार्यपणे तेलाच्या दरावरही झाले. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये तेलाच्या एका बॅरलचा दर १४३ डॉलरवरून थेट चक्क ३४ डॉलर्स इतका खाली कोसळला.

तेलाला खऱ्या अर्थानं पुन्हा उभारी दिली ती चीननं. चीनमध्ये पायाभूत सुविधांवर सरकारनं अफाट खर्च सुरू केला. रस्ते, पूल, महामार्ग यांच्या अफाट कामांमुळं तिथल्या अर्थव्यवस्थेनं गती पकडली. त्यातच वाहनांच्या मागणीतही मोठी वाढ झाली. चीनच्या शहरी मध्यमवर्गात चारचाकी व दुचाकी वाहनं विकत घेण्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळं २००८ ते २०१३ या पाच वर्षांतच चीनमधली तेलाची मागणी ३५ टक्‍क्‍यांनी वाढली. त्यापाठोपाठ भारत व ब्राझीलसारख्या वेगानं विकासाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थांमुळं तेलाची मागणी वाढू लागली आणि त्याचे दरही. त्यामुळं तेलानं पुन्हा शंभर डॉलरचा टप्पा सहज गाठला. मात्र ही तेजी अल्पजीवी ठरली. २०१४ च्या प्रारंभी तेलाच्या दरानं घसरणीच्या दिशेनं प्रवास सुरू केला. याची कारणं पुन्हा थोडाफार तशीच होती. दरम्यानच्या काळात कॅनडा व अमेरिकेत तेलाचं उत्पादन अफाट वाढलं होते. २०१० मध्ये दररोज ५५ लाख बॅरल तेल उत्पादन करणाऱ्या अमेरिकेत अवघ्या पाच वर्षांत म्हणजे २०१५ मध्ये मात्र तब्बल ९६ लाख बॅरलचे दररोज उत्पादन होऊ लागलं. कॅनडाची परिस्थितीही अशीच आहे. यात भर पडली ती इराकची. अनेक वर्षं युद्धात होरपळलेल्या इराकमधलं तेल उत्पादन बंदच झालं होते. ते आता सुरू झालं असून तिथंही दररोज वीस लाख बॅरल तेलाचं उत्पादन होत आहे. एका बाजूला तेलाचं उत्पादन अशा रितीनं वाढत असताना मागणी मात्र त्या प्रमाणात वाढलेली नाही. ज्या चीननं तेलाला आधार दिला त्या देशातल्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला. चीनचा गेली अनेक वर्षं डोळे दिपवून टाकणारा, दहा टक्के विकासदर एकआकडी झाला. युरोपात मंदी आहेच. अमेरिकेतही फारशी तेजी नाही. एका बाजूला तेलाचं उत्पादन वाढलं पण चीनमधली आणि जागतिक पटलावरची परिस्थिती बदलल्यानं मागणी कमी झाली आणि तेलाचे दर कोसळण्यास सुरवात झाली.

सौदी अरेबियाची खेळी
मागणीप्रमाणं उत्पादन करावं हा साधा सोपा उपाय. म्हणजे सध्या जर तेलाला मागणीच नसेल तर उत्पादन थोडं कमी करावं म्हणजे तोटा होणार नाही असा साधा सोपा मार्ग कोणीही सुचवेल. पण खरी मेख इथेच आहे. सध्या मागणी कमी असूनही तेलाचं उत्पादन बेसुमार सुरू आहे. तेल उत्पादन करणाऱ्या देशांच्या संघटनेच्या (ओपेक) बैठकीत तेलाचं उत्पादन कमी न करण्याचा अनाकलनीय निर्णय घेण्यात आला. चार डिसेंबरला हा निर्णय झाला आणि त्याच दिवशी तेलाचे दर पुन्हा पाच टक्‍क्‍यांनी कोसळले. उत्पादन कमी करण्यास सौदी अरेबियाचा कडाडून विरोध आहे. याला कारण म्हणजे सौदीला रशिया व इराणला धडा शिकवायचा आहे. सिरियातील बशीर असाद यांच्या राजवटीला या दोन्ही देशांनी पाठिंबा दिल्यामुळं त्यांना सरळ करण्यासाठी सौदीनं ही खेळी खेळली आहे. समजा ओपेकच्या सदस्यांनी तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तर, मग सौदी अरेबिया तेलाचं उत्पानन वाढवून त्याला शह देईल अशी स्थिती आहे. त्यामुळं सध्या मागणीपेक्षा अफाट तेल उत्पादित होत असून परिणामी भाव कोसळत आहेत. यात भर म्हणून आता इराणचा या बाजारपेठेत प्रवेश होत आहे. अमेरिकेनं इराणशी अणुकरार केल्यामुळं युरोपियन युनियन व अमेरिकेनं त्या देशावरचे निर्बंध उठवले आहेत. त्यामुळं जागतिक तेलव्यापारास इराण सज्ज झाला आहे. या वर्षअखेरीस इराण दररोज सहा लाख बॅरल तेल निर्माण करेल असं मानलं जातं. सौदी अरेबियाला हे रुचलेलं नाही. त्यामुळं इराणचे स्वागत ‘पडत्या दरानं’ करायचं अशी त्यांची खेळी आहे.  

अशा प्रकारे तेलाचे भाव कमी राहणं अनेक देशांना परवडण्यासारखं नाही. सौदी अरेबियाला हे पुरतं ठावूक आहे. सौदीकडं अफाट परकीय गुंतवणूक व गंगाजळी आहे त्यामुळं हा देश अन्य देशांपेक्षा बराच काळ तग धरू शकतो. त्यामुळं तेलाचे कमी दर ठेवत रशियाला अडचणीत आणायचं असा सौदी अरेबियाचा डाव आहे. रशियात आत्ताच महागाईनं सामान्यांचं कंबरडं मोडलं असून त्या देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. सामान्यांचं यावरून लक्ष वळवण्यासाठीच अध्यक्ष पुतीन यांनी सिरियात सैन्य धाडण्याची खेळी खेळल्याचं राजकीय विश्‍लेषक मानतात. सध्याच्या परिस्थितीत जगात पुन्हा तेलाची मागणी वाढणं हाच या समस्येवरील तोडगा आहे. पण चीनमधली सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता तिथं नजीकच्या काळात तसं घडण्याची शक्‍यता नाही. ब्राझीलचीही अवस्था बिकटच आहे. जगात सध्या भारताची अर्थव्यवस्था तुलनेनं चांगली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर तेल उत्पादन कमी करणं हा तोडगा आहे. सौदी अरेबिया हे पाउल कधी टाकतेय याकडं जगाचे लक्ष आहे. या मुद्द्यावरून सौदी अरेबिया व इराण या दोन पारंपरिक शत्रूंमधला संघर्ष शिगेला पोचण्याची भीती वर्तविली जात आहे. कदाचित तेलाच्या या संघर्षाचं रूपांतर छोट्या युद्धात होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

तेलउत्पादक देशांना तडाखा
- व्हेनेझुएलाचे तत्कालीन अध्यक्ष ह्यूगो चावेझ यांनी तेलाच्या पैशातून लाखो गरिबांना स्वस्त दरात घरं दिली. २०१३ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर नवे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनीही ही योजना सुरू ठेवली, पण तेलाच्या दरातल्या घसरणीमुळं भाव गडगडल्यानं ही योजना अडचणीत आली. महागाई तुफान वाढली. त्यामुळं गेल्या महिन्यात तिथं झालेल्या निवडणुकीत लोकांनी त्यांच्या पक्षाला पराभूत केलं. व्हेनेझुएलातल्या नव्या सरकारनं आता साठ दिवसांची आर्थिक आणीबाणी जाहीर केली आहे. 
- रशियाला निम्मा महसूल तेलनिर्यातीतून मिळतो. त्यामुळं दर कोसळल्याचा मोठा फटका रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. या देशाचं चलन रुबलचा दर डॉलरच्या तुलनेत नीचांकी झाला आहे. सरकारनं अनेक विभागांना खर्च दहा टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा आदेश दिला आहे. 
- सौदी अरेबियाला तेलउद्योगातून ७३ टक्के महसूल मिळतो. गेल्या वर्षभरात तेलाचे भाव पडल्यानं सरकारच्या उत्पन्नात २३ टक्के घट झाली आहे. डिसेंबरमध्ये तेथील सरकारनं अत्यंत स्वस्त मिळणाऱ्या पेट्रोलचे दर ४० टक्‍क्‍यांनी वाढविले. अन्य वस्तूंवरील सबसिडी कमी केली आहे. सरकारी कंपन्यांतील वेतनवाढ रोखली आहे. 
- अझरबैजानमध्ये महागाई वाढू लागल्यानं लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत. या देशाची सारी भिस्त तेलउद्योगावरच आहे. 
- नायजेरियातदेखील वाढता भ्रष्टाचार व तेलाच्या किंमती कोसळल्याचा फटका अध्यक्ष गुडलक जोनाथन यांना बसला. निवडणुकीत त्यांच्या पक्षाला पराभूत व्हावं लागलं असून माजी लष्करशहा मोहंमद बुहारी यांच्याकडं जनतेनं देशाची सूत्रं दिली आहेत.

अर्थनीतीच्या भूमितीत अडकलेला भारत (संदीप वासलेकर)

दुसऱ्या महायुद्धात जपान आणि जर्मनी हे देश उद्‌ध्वस्त झाले होते; परंतु काही वर्षांत ते आर्थिक महासत्ता बनले. हे कसं शक्‍य झालं? तिथल्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण बाजूला ठेवून अर्थनीतीच्या भूमितीमधल्या नियमांवर लक्ष केंद्रित केलं व तिथल्या उच्चभ्रू समाजानं परिघातल्या स्टेटसचा नाद सोडून आपल्या भोवतालचं वर्तुळ पुसून टाकलं. आपण काय करणार आहोत?

जेव्हा आपण आर्थिक आवाहनांबद्दल चर्चा पाहतो वा ऐकतो, तेव्हा एक विरोधाभास समोर येताना दिसतो. एकीकडं पुण्या-मुंबईत लोक कोट्यवधी रुपये खर्च करून घर घेतात, तर दुसरीकडं शेतकरी आत्महत्या करतात. एकीकडं जगातल्या प्रमुख आर्थिक सत्तांमध्ये भारताचं नाव घेतलं जातं, तर दुसरीकडं अनेक हुशार युवक भारतात भविष्य नसल्यानं परदेशात स्थायिक होण्याची आकांक्षा धरतात. एकीकडं तेलाच्या किमती कमी होऊन महागाई थांबतेय, असं वाटतं, तर दुसरीकडं तेलाच्या किमती कमी झाल्यामुळंच आपली निर्यात कमी होते. जे काही चांगलं होतं, ते आपल्यामुळं व जे काही वाईट होतं ते प्रतिस्पर्धी पक्षामुळं असं प्रत्येक मोठा राजकीय पक्ष मानतो. त्यामागे जनतेला भुरळ पाडून मतांचं अंकगणित असते.

प्रत्यक्षात आपली आर्थिक परिस्थिती अंकगणितात नव्हे; तर भूमितीच्या आकृत्यांमध्ये अडकलेली आहे, यात मध्यभागी आहे त्रिकोण. या त्रिकोणाची एक बाजू गरिबी-श्रीमंती, दुसरी बाजू लोकसंख्या आणि तिसरी बाजू पर्यावरण. २००१ मध्ये भारताची लोकसंख्या १०० कोटी होती. त्यापैकी २० कोटी लोक सुखवस्तू होते. बाकी ८० कोटी लोक गरीब किंवा यथातथाच होते. गेल्या १५ वर्षांत सुमारे २५ कोटी लोकांचं राहणीमान सुधारलं. सध्या ४५ कोटी लोक सुखवस्तू आहेत; परंतु सध्या लोकसंख्यासुद्धा १२५ कोटी आहे. म्हणजे सुखवस्तू लोक दुपटीपेक्षा जास्त वाढूनदेखील ८० कोटी लोक यथातथाच आहेत. जर प्रचंड प्रमाणात उद्योगनिर्मिती करून उत्पन्न वाढवलं व उरलेल्या ८० कोटी लोकांचं राहणीमान सुधारण्याचा प्रयत्न केला तर झाडं, डोंगर, नद्या, तळी यांची विल्हेवाट लागेल. पावसावर परिणाम होईल. शेतीचं नुकसान होईल व ज्यांचं राहणीमान सुधारलं आहे, ते पुन्हा खाली घसरतील. अशा या त्रिकोणानं आपल्याला ८० कोटींच्या सापळ्यात अडकवलेलं आहे.

गेल्या १५ वर्षांत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस व पुन्हा भारतीय जनता पक्ष अशी सरकारं आली. प्रत्येकाच्या कार्यकाळात सापळा तसाच राहिला व सुखवस्तू लोकांची संख्याही वाढत राहिली. हा प्रश्‍न एवढा मूलभूत आहे, की राजकीय पक्षांनी एकमेकांना दोष देऊन तो सुटणार नाही. त्यासाठी वेगळा विचार करण्याची गरज आहे.

मात्र, वेगळा व नावीन्यपूर्ण विचार करायचं ठरवलं, तर आपण वर्तुळात सापडतो. जर अर्थनीतीला गती द्यायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. गेल्या १५-२० वर्षांत माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून इन्फोसिस, टीसीएस, विप्रो असे अनेक उद्योगसमूह पुढे आले. अलीकडं फ्लिपकार्टसारख्या कंपन्याही यशस्वी झालेल्या आहेत; परंतु संगणक, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल भारत या सर्व क्षेत्रांत तंत्रज्ञानाचं स्वरूप असं आहे, की रोजगारनिर्मिती होत नाही. इन्फोसिस, विप्रो व टीसीएस यांतले एकत्र मिळून फक्त सात लाख लोक काम करतात. संपूर्ण भारतात संगणक व माहिती तंत्रज्ञानसंबंधीच्या क्षेत्रात जेमतेम २०-२५ लाखांचा रोजगार आहे. म्हणजे १२५ कोटींच्या देशात हे क्षेत्र सव्वा कोटी लोकांनादेखील नोकरी देऊ शकणार नाही. असं असलं तरी आपल्याला या क्षेत्रात आगेकूच केलीच पाहिजे; परंतु त्यामुळं आपण ‘तंत्रज्ञानाची गरज व बेरोजगारी व तरीही तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करण्याची आवश्‍यकता’ अशा वर्तुळात सापडलो आहोत. हे वर्तुळ आपल्या अर्थनीतीभोवती गेली २० वर्षं फिरत आहे. या काळात आपल्याकडं काँग्रेसनं १० वर्षं, भाजपने आठ वर्षं व तिसऱ्या आघाडीनं दोन वर्षं राज्य केलं. जेव्हा वर्तुळाची चमकदार बाजू समोर दिसते, तेव्हा जो पक्ष सत्तेत असतो, तो श्रेय घेतो. प्रत्यक्षात वर्तुळ फिरतच राहतं!

दुसरं वर्तुळ मोठ्या उद्योगधंद्यांसंबंधीचं आहे. सध्या बरेचसे उद्योगसमूह ३०-४० टक्के उत्पादनक्षमता वापरू शकतात. त्यांचं कर्ज खूप मोठं आहे. कर्जाच्या ओझ्याखाली व कारखाने अर्धवट बंद पडलेल्या स्थितीत मोठे उद्योगसमूह सरकारकडं माय-बाप म्हणून पाहतात. सरकार पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून उद्योगसमूहांना धंदा देतं; पण हे सर्व सरकारच्या म्हणजे आपल्या सर्वसामान्यांच्या पैशानं होतं. सरकारनं पैसा खर्च केला तर उद्योगसमूहांमध्ये चैतन्य येईल; पण सरकारच्या तिजोरीवरचा भार वाढेल. त्यामुळं कधी ना कधी तरी अर्थव्यवस्था धोक्‍यात येईल. सरकारनं गुंतवणूक नाही केली तर उद्योगसमूह लिलावात निघतील.

हे वर्तुळ छेदायचं असेल, तर सरकारकडं ग्राहक म्हणून न पाहता जागतिक बाजारपेठ काबीज केली पाहिजे. ते फक्त सॉफ्टवेअर व माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रातल्या कंपन्यांना जमतं. त्यांच्यावर आर्थिक घडी अवलंबून राहिली तर २५ लाखांच्या वर लोकांना नोकरी मिळणं कठीण. असा हा एकमेकांत गुंतलेल्या वर्तुळांचा गुंता सोडवायचा असेल, तर राजकीय पक्षांनी एकमेकांना दोष देऊन काही तो सुटणार नाही. त्यातून काही उत्तर मिळणार नाही.

यापैकी बरेचसे प्रश्‍न केवळ भारतापुरतेच मर्यादित नाहीत. अमेरिकेसारख्या प्रगत देशातदेखील गेल्या १०-१५ वर्षांत आर्थिक वृद्धी ही तंत्रज्ञानाच्याच साह्यानं झालेली आहे. मात्र, रोजगारात फारशी वाढ झाली नाही. त्यामुळं काही लोक महाश्रीमंत झाले. अनेक युवक गरिबीत ढकलले गेले. हे असंच पुढं सुरू राहील. युरोप, ऑस्ट्रेलिया व विकसनशील देशातदेखील हीच प्रक्रिया दिसते. गेली दोन-तीन वर्षं हाँगकाँगमध्ये युवकांचं आंदोलन सुरू आहे. अलीकडेपर्यंत हाँगकाँग हे एक श्रीमंत बेट म्हणून ओळखलं जाई. तिथं अनेक लोक ऐषआरामात राहतात; पण नव्या पिढीला घर, नोकरी व म्हणून बायकोही मिळणं कठीण झालं आहे. कोरियात युवकांना शहरात जाऊन नोकऱ्या मिळतात; पण मध्यमवयीन मंडळींना नवीन तंत्रज्ञान अवगत नसल्यानं त्यांना बेकार होऊन घरी बसावं लागतं. वृद्धांची परिस्थिती त्याहीपेक्षा बिकट आहे. अर्थव्यवस्थेचं स्वरूप संपूर्ण जगभर बदलत चाललं आहे.

जगभरच आर्थिक स्थिती एका भीषण वर्तुळात अडकल्यामुळं भारतातून निर्यात करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे व ती वाढत जाईल. इथं पायथागोरसचा सिद्धांत आपल्याला अडवतो. जेव्हा आपण एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोनात उभे असतो, तेव्हा अ-वर्ग+ब-वर्ग= क-वर्ग हे समीकरण जुळतं. म्हणजे आपल्या समोर दिसणारी ‘क’ बाजू आपल्याला जागतिक बाजारपेठेत वाव दाखवते; परंतु ती ‘अ’ व ‘ब’ या बाजूंच्या लांबीवर अवलंबून असते. त्यातली ‘अ’ बाजू म्हणजे आपल्या उद्योगसमूहांची अंतर्गत क्षमता व ‘ब’ बाजू म्हणजे परदेशी ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता. आपले उद्योगसमूह ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी उत्पादनक्षमतेत व कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असल्यानं ‘अ’ बाजू तोकडी पडते व तेलाच्या किमती घसरल्यानं बऱ्याच देशांची ऐपत कमी होऊन ‘ब’ बाजू तोकडी पडते. ‘क’ बाजू त्यामुळं मोठी होऊच शकत नाही. यापैकी ‘ब’ बाजू आपल्या हातात नाही. आपण ‘अ’ बाजू कशी वाढवू शकतो, याचा विचार करू शकतो; परंतु तसं करण्याऐवजी आपण परस्परदोषांचं राजकारण करण्यात समाधान मानतो.

आपली अर्थनीती भूमितीत अडकण्याचं मुख्य कारण म्हणजे, आपल्या भारतीय उच्चभ्रू समाजाचं मन परिघात अडकलेलं आहे. परिघाच्या बाहेर जग आहे, याचा आपल्याला विसर पडला आहे. ‘सप्तरंग’मध्ये उत्तम कांबळे आपल्याला दर रविवारी परिघाबाहेरील लोकांच्या जगण्याची, तिथल्या वास्तवाची आठवण करून देत असतात; परंतु असे प्रयत्न अपवादात्मक होतात व ते स्थानिक भाषांपुरते मर्यादित राहतात. इंग्लिश वर्तमानपत्रं, चर्चा व आपल्या अग्रगण्य अर्थतज्ज्ञांची मतं पाहिल्यावर आपण एका परिघात मानसिकरीत्या अडकलेलो आहोत, हे स्पष्ट दिसतं. दिवसेंदिवस तो परीघ लहान होत चालला आहे, याचं आपल्याला भान राहत नाही.

आपण जरी परिघाबाहेरच्या वास्तवाचा विचार केला नाही, तरी वास्तव हे वास्तवच असतं. जर परिघाबाहेर आग लागली तर परिघाच्या आत असलेले आपण त्या आगीपासून वाचू शकणार नाही. जेवढा परीघ छोटा तेवढा आपल्यावर आगीचा परिणाम लवकर!

अशा परिस्थितीत भारताला आशा आहे का? दुसऱ्या महायुद्धात जपान आणि जर्मनी हे देश उद्‌ध्वस्त झाले होते; परंतु काही वर्षांत ते आर्थिक महासत्ता बनले. हे कसं शक्‍य झालं? तिथल्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण बाजूला ठेवून अर्थनीतीच्या भूमितीमधल्या नियमांवर लक्ष केंद्रित केलं व तिथल्या उच्चभ्रू समाजानं परिघातल्या स्टेटसचा नाद सोडून आपल्या भोवतालचं वर्तळ पुसून टाकलं. आपण काय करणार?

आपली अर्थनीती भूमितीत अडकण्याचं मुख्य कारण म्हणजे, आपल्या भारतीय उच्चभ्रू समाजाचं मन परिघात अडकलेलं आहे. परिघाच्या बाहेर जग आहे, याचा आपल्याला विसर पडला आहे. आपण जरी परिघाबाहेरच्या वास्तवाचा विचार केला नाही, तरी वास्तव हे वास्तवच असतं!

Monday, January 25, 2016

Rohit vemmula

रोहित वेमुला यास,

तुला अनावृत्तपत्र लिहायचे कारण तुलाही पक्के ठाऊक असेलच. ज्याला उद्देशून असे पत्र लिहीले जाते त्याने ते वाचू नये, पण इतरांनी अगत्याने वाचावे, म्हणून लिहीतात, त्यालाच अनावृत्तपत्र म्हणतात ना? तुझे आत्महत्येपुर्वीचे पत्रही असेच होते. ते कोणी कोणी वाचले हे बघायला तू हयात कुठे होतास? पण कित्येक लोकांनी ते वाचले आणि ज्यांना ते जमणार नव्हते, त्यांना माध्यमातील नामवंतांनी वाचून दाखवले. अर्थात अशा पत्रातले काय आपल्या सोयीचे असेल, तितकेच वाचले वा वाचून दाखवले जात असते. तुझे पत्रही त्याला अपवाद नव्हते. सहाजिकच त्यातले शब्द वाक्ये वा उतारे प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार वाचले वा इतरांना वाचून ऐकवले. कारण तू आत्महत्या केली होतीस आणि तुला काय म्हणायचे होते वा नव्हते, त्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी तू हयातच कुठे होतास? म्हणून तर तुझ्या त्या पत्राला बाजारात प्रचंड किंमत आली. अन्यथा मुठभर लोकांनीही त्याकडे ढुंकून बघितले नसते. तू हयात असताना काय आणि किती लिहीत बोलत होतास. पण त्यातल्या कुठल्या शब्दांची कोणी दखल घेतली का? इतरांना वाचून दाखवणे दूर, आज उर बडवणार्‍या कोणीही तेव्हा तुझ्या शब्दांकडे वळून बघण्याचेही कष्ट घेतले नव्हते. पण आज तुझ्या शब्दांना राजकीय प्रसिद्धीच्या बाजारात तेजी आली आहे, म्हटल्यावर तुकडे पाडून वा वाटे घालून त्या पत्राचा व्यापार जोरात चालला आहे. ज्यांच्या सोयीने शब्द त्यात नाहीत, त्यांनी तुझ्याच जुन्यापान्या शब्द वा लेखनाचे उत्खनन चालविले आहे. यातल्या कोणालाही त्या शब्द वा त्याच्या मतितार्थाशी काडीमात्र कर्तव्य नाही. प्रत्येकाला आपापला उल्लू सीधा करण्यासाठी त्यातला वाटा हिस्सा हवा आहे. मृतदेहाभोवती घिरट्या घालणारी, गर्दी करणारी गिधाडे असावित, तशी तुझ्या आत्महत्येभोवती कशी झुंबड उडाली आहे बघ. तुझ्या बलिदानाला केविलवाणे करून टाकले या लोकांनी!

ज्यांना आपला युक्तीवाद किंवा इझम पुढे न्यायचा असतो, त्यांच्या बाजारात यापेक्षा काहीच वेगळे होत नसते रोहित! म्हणूनच त्यांना हुतात्मे शहीद हवे असतात. मग दाभोळकर, कलबुर्गी सापडला तर ते आनंदित होतात. त्याच्या वेदना यातनांकडे ढुंकूनही न बघता असे बाजारू ‘सेल्फ़ी’ घेण्यासाठी त्याच्या भोवती झुंबड करतात. आताही हैद्राबादच्या त्या विद्यापिठात किती वर्दळ सुरू झाली आहे बघतो आहेस ना? दूर दिल्ली वा कोलकात्यातून येणारे डावे, पुरोगामी सोड, त्याच तुझ्या विद्यापिठातले विविध प्राध्यापक अधिकारीही कसे सरसावून पुढे आलेत बघ. यांना तर रोहित वा त्याच्या संवेदना कित्येक महिने वर्षापुर्वी दिसू शकत होत्या ना? मग तू निराश हताश होऊन घुसमटत होतास, तेव्हा यातला कोणी खांद्याला खांदा लावून कधीच कसा उभा राहिला नाही रे? आता म्हणे त्यातल्या अनेकांनी आपापल्या अधिकारपदाचे राजिनामे दिलेत. नित्यनेमाने आवारात धरणी चालू आहेत. भाषणे व घोषणा चालू आहेत. दुसरीकडे ज्यांना तुझ्या आत्महत्येचे गुन्हेगार ठरवले जाते आहे, त्यांनीही यापुर्वी रोहितने काय लिहीले, ते शोधून संशोधन करून जगापुढे आणत आहेत. कोणी तुझ्या जन्मजातीचा शोध घेतला आहे, तर कोणी तुझ्या वंशावळीचा शोध घेऊन नवनवे सिद्धांत मांडत आहेत. त्यात मग मार्क्सवादी वा पुरोगाम्यांसह चळवळीच्या बाबतीत तूझा कसा भ्रमनिरास झालेला होता, त्याचे दाखले दिले जात आहेत. पण तिकडेही बघायला कुणा पुरोगाम्याला वेळ नाही. सहाजिकच आहे. ज्यांना बळी वा शहीद हवा आतो, त्यांना त्याच्या शब्द भावनांशी काय कर्तव्य असणार? पण त्यांच्या अशा मतलबाला शह देण्यासाठी दुसर्‍या बाजूला आपला बचाव मांडताना तुझ्या जुन्या शब्दांचे शोध घ्यावे लागत आहेत. मात्र शब्दात आशय कोणता आहे किंवा त्यातून रोहितची मनोव्यथा काय आहे, याविषयी संपुर्ण अलिप्तता आहे.

हेच होत आले आजवर रोहित! कुठल्याही विचारसरणी वा तत्वज्ञानाने मानवी कल्याणाचा व उत्थानाचा गजर खुप केला, पण त्यातली माणुसकी कुठल्याच तात्वज्ञानाला कधी उमजली नाही. आजही बघतोस ना? फ़ुले, शाहू आंबेडकरांच्या नावाचा सगळीकडे किती उदघोष चालू असतो. पण त्यांनी सांगितलेल्या लिहीलेल्या शब्दांचा आशय कोणी थोडातरी समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे काय? अशा महात्म्यांच्या नावाचा नामजप अखंड करणार्‍यांना त्यातल्या आशयाची काडीमात्र किंमत नसते. कारण त्या आशयाला, भूमिकेला वा मतितार्थाला बाजारात मूल्य मिळत नाही. बाजाराचे एक सुत्र असते. आपला माल विकण्यासाठी व त्याकडे ग्राहकाला ओढून घेण्यासाठी उत्तम जाहिरात आणि झकास पॅकिंग आवश्यक असते. त्यासह नजरेत भरणारे एक मॉडेल शोधावे मिळवावे लागते. वर्षानुवर्षे उलटून जातात, पिढ्यानुपिढ्या तोच माल विकला खपवला जात असतो. बदलत असतात, ती मॉडेल्स, जाहिराती किंवा पॅकिंग! पन्नास वर्षापुर्वी कोकाकोला किंवा कुठला सौंदर्य साबण तेव्हाच्या नट्या विकत असायच्या. आज कोणी मधूबालाकडून साबणाची करून घेत नाही, की पेप्सी विकायला आता कुणी अझरुद्दीनला झळकवत नाही. सचिनही मागे पडलाय. आता तोच लक्स साबण दिपीका पदुकोणच्या सौंदर्याचे रहस्य असतो. ग्राह्काला त्यातच मधूबालाच्या सौंदर्याचे रहस्य असल्याचा थांगपत्ता नसतो. तसा तू मॉडेल झालास रे रोहित! कालपर्यंत दाभोळकर, कलबुगी, पानसरे यांचा वापर झाला आणि आता रोहित हाती लागलाय. कोण कशाला संधी सोडणार ना? अरे तुझ्या जन्मदात्या मातापित्यांनाही आपले अश्रू खोटे वाटतील, इतका टाहो फ़ोडला जातोय. बाजार गरम आहे रोहित! दादरीच्या अखलाख महंमदचाही जमाना होता सहा महिन्यापुर्वी! आज त्याची आठव्ण कोणा रडवेल्या व्यापार्‍याला राहिली आहे काय? सहा महिन्यांनी रोहितही कुणाच्या स्मरणात नसेल.

हा पुरोगामी बाजार आहे रोहित! इथे बाजारातील तेजीमंदीविषयी संवेदनशीलता महत्वाची असते. दाभोळकर कलबुर्गी वा अखलाख दुय्यम असतात. कालपरत्वे त्यांची महत्ता संपुष्टात येते. विकायचा माल महत्वाचा असतो. त्यासाठी मॉडेलसारखे शहीद वा बळी हवे असतात. कधी पुण्यातला सॉफ़्टवेअर इंजिनीयर मोहसिन तेजीत येतो आणि मग विस्मृतीत गायब होतो. तर कधी अखलाख तेजीत येतो. आज तुझ्या आत्महत्येला बाजारात तेजी आहे. माझे शब्द तुला क्रुर वाटतील रोहित! पण समोर बघ, सहा महिन्यापुर्वी दाभोळकर, कलबुर्गी, अखलाखच्या नावावर आपापले पुरस्कार माघारी देण्याचे ‘बलिदान’ करणारे महात्मे आता तुझ्या आत्महत्येच्या मुहूर्तावर तेच पुरस्कार परत घ्यायला सज्ज झाल्याची बातमी आहे. त्याचा अर्थ इतकाच, की तेव्हाच्या त्या बळींचा शेअर उतरला आहे. बाजार भयंकर क्रुर असतो रोहित! भावनेला वा संवेदनेला तिथे किंमत नसते. संवेदनाशील शब्द ही जाहिरात असते आणि शहीद गेलेला बळी हे मॉडेल असते. पुरोगामीत्व ही आजकाल राजकीय सामाजिक बाजारात मॅगीसारखी उपभोग्य वस्तू झाली आहे. मॅगीसारखे फ़ास्टफ़ुड! फ़ेअर एन्ड लव्हलीसारखे चार दिवसात गोरेपण बहाल करणारे रसायन म्हणजे पुरोगामीत्व आहे रोहित! त्यातून खरेच समाजातला अन्याय नष्ट होईल वा सामाजिक समता प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा कशी बाळगता येईल? तात्पुरते समाधान मिळण्यावर ग्राहकाने खुश व समाधानी व्हायचे असते. तोच कुठल्याही बाजाराचा नियम असतो. अरे समता खरेच प्रस्थापित झाली, तर पुरोगामीत्वाचा बाजार गुंडाळून बंद करावा लागेल ना? मग झेंडे कुठले मिरवायचे? तुझ्या आत्महत्येचे दु:ख तेवढ्यासाठी आहे. आपण कशासाठी आहुती देतोय आणि कोण त्याचा फ़ुकटात मॉडेल म्हणून वापर करून आपले धंदे तेजीत घेऊन जातील, याची सुतराम कल्पना तुला नव्हती, याचे दु:ख होते. पण आता काय उपयोग? व्हायचे ते होऊन गेले ना? व्यापारी लौकरच पुढल्या अखलाख, रोहित वा कलबुर्गीच्या प्रतिक्षेत दिसतील. व्याकुळलेले तुझे मुठभर आप्तस्वकीय सोडून अन्य कुणाला तुझे शब्द तेव्हा आठवणारही नाहीत....

©® भाऊ तोरसेकर

Sunday, January 17, 2016

मरतुकडी गाय-उल्हास हरी जोशी,

मरतुकडी गाय
उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
नुकतीच एक चिनी लोककथा माझ्या वाचण्यात आली.
चिनमधले एक विद्वान गुरू आपल्या काही शिष्यांसकट प्रवासाला निघाले. त्यांना एक ओसाड प्रदेश लागला. त्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष होते तर गवताचे एक पान पण दिसत नव्हते. त्या प्रदेशातील एका टेकडीवर त्यांना एक जिर्ण झालेली, मोडकळीला आलेली झोपडी दिसली. या अशा ओसाड प्रदेशात कोण रहात असावे या कुतुहलाने ते त्या झोपडीजवळ गेले. तेथे त्यांना एक मध्यमवयीन चिनी जोडपे, त्यांची तीन लहान मुले व एक मरतुकडी गाय दिसली. ‘तुमचे कसे भागते?’ गुरुंनी त्या चिनी माणसाला विचारले. त्याने त्या मरतुकड्या गाईकडे बोट दाखवले व म्हणाला, ‘ही गाय रोज आम्हाला थोडे थोडे दूध देते. यातील काही दूध आम्ही वापरतो. उरलेल्या दूधाचे दही करून त्याचे लोणी तयार करून जवळच्या गावात जाऊन विकतो. त्याचे जे काही थोडेफार पैसे मिळतात त्यातुन इतर गरजेच्या वस्तु आणतो. आमचे कसेतरी भागते.’
गुरु टेकडी उतरून खाली आले व आपल्या शिष्यांना म्हणाले, ‘ताबडतोब ती मरतुकडी गाय मारून टाका!’ गुरुंची ही आज्ञा ऐकून शिष्य चांगलेच गोंधळले. ज्या गाईवर त्या माणसाचे जिवन चालू आहे, त्या कुटुंबाला रोजी रोटी मिळते आहे ती गाय मारून टाकायची? शिष्यांना वाटले आपले गुरु किती निर्दय व निष्ठूर आहेत. कोणी शिष्य गाय मारायला तयार होईना. शेवटी हे काम गुरुंनी स्वतःच करायचे ठरवले. ‘बोला माझ्याबरोबर कोण येणार आहे?’ त्यांनी शिष्यांना विचारले. कसाबसा एक शिष्य तयार झाला. त्या रात्री गुरु त्या शिष्याला टेकडीवर घेऊन गेले, त्या मरतुकड्या गाईला टेकडीवरून खाली ढकलले व गाय मेल्याची खात्री करून घेऊन परत आले व आपल्या शिष्यांबरोबर पुढच्या प्रवासाला लागले.
त्यांच्या बरोबर जो शिष्य गेला होता त्याला फार ‘गिल्टी फिलिंग’ येऊ लागले. गुरुंनी जे केले ते पाप होते व त्या पापामध्ये आपण पण भागीदार होतो असे वाटून त्याच्या मनात शरमेची भावना निर्माण झाली. काही वर्षे त्याने ही भावना दाबून ठेवली पण एक दिवस या भावनेचा उद्रेक झाला. त्या कुटुंबाचे काय झाले हे पहाण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. गुरुला न कळवताच तो त्या झोपडीच्या ठिकाणी आला.
तेथे आल्यावर त्या शिष्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या क्षेत्राचा संपूर्णपणे कायापालट झाला होता. झोपडीच्या जागी एक आधूनीक, टोलेजंग बंगला उभा होता. बंगल्याच्या बाहेर अनेक आधुनीक मोटारी उभ्या होत्या. बंगल्याभोवती सुरेख बगीचा केला होता. सगळीकडे हिरवळ होती व काही शेते पण दिसत होती. शिष्याला वाटले आपण चुकीच्या ठिकाणी आलो. त्यांने तिथल्या एका माणसाला विचारले, ‘मा॑फ करा! मी कांही वर्षांपूर्वी येथे आलो होतो तेव्हा हा भाग ओसाड होता. वरती टेकडीवर एक झोपडी होती. आता त्या झोपडीतील माणसे कुठे असतात?’
‘तुमचे म्हणणे बरोबर आहे!’ त्या माणसाने उत्तर दिले. ‘त्या झोपडीतील माणसे इथेच म्हणजे त्या बंगल्यात रहातात. हा त्यांचा बंगला आहे. आज त्यांच्याकडे फंक्शन आहे.’
आश्चर्य वाटून तो शिष्य टेकडी चढून बंगल्यापाशी आला. त्याने पाहीले की तोच चिनी माणूस व त्याची बायको एका भव्य सोफ्यावर बसले आहेत व त्याची तीन तरूण मुले उत्साहाने सगळ्यांचे स्वागत करत आहेत. तो शिष्य त्या बंगल्यात गेला व त्या चिनी माणसाला म्हणाला, ‘काही वर्षांपूर्वी मी माझ्या गुरुंबरोबर येथे आलो होतो. त्यावेळी तुम्ही एका मोडक्या, जिर्ण झालेल्या झोपडीत तुमच्या तीन मुलांबरोबर रहात होतात. तुमच्याकडे एक हडकूळी गाय पण होती.’
‘अगदी बरोबर आहे.’ तो चिनी माणूस उत्तरला ‘एका रात्री आमची गाय टेकडीवरून खाली पडली व मेली. आमचा तर आधारच हरपला. जगायचे कसे हा प्रश्न उभा राहीला. कारण तोपर्यंत आम्हाला गायीच्या दुधावरच जगायची सवय होती. जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. हळू हळू आमच्या असे लक्षात येऊ लागले की आमच्याकडे अनेक कौशल्ये आहेत जी आम्हाला ठाऊक नव्हती. आम्ही त्या कौशल्यांचा विकास करायला सुरवात केली, उद्योग व्यवसायात पदार्पण केले. हे तीन तरूण ही माझी मुले आहेत. तुम्ही याचे परिणाम बघताच आहात. जर आमची गाय मेली नसती तर हे घडले नसते!’
आता त्या शिष्याला कळले की गुरु गाय मारयला का सांगत होते. त्याला आपल्या गुरुंच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले व गुरुविषयींचा आदर कित्येक पटीने वाढला.
अनेक मराठी माणसांच्या आयुष्यात अशीच एक गाय असते ज्याला ‘नोकरी’ असे म्हणतात. मराठी माणसांची नजर या अशा गायीवरच असते. या गाइचे जे दूध मिळते (म्हणजे पगार मिळतो) त्यावर भागवण्याची सवय लागते. कोणाच्या नशीबात धष्टपुष्ट गाय येते तर कांहीना किरकोळ गाय मिळते तर काहींच्या नशीबात अशी गायच नसते.
मराठी माणसाचे सगळे कर्तृत्व त्याच्या नोकरीवर व नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ज्याला उत्तम नोकरी मिळते तो जास्त कर्तृत्ववान, ज्याला बरी नोकरी मिळते तो कमी कर्तृत्ववान व ज्याला नेकरीच मिळत नाही त्याला ‘कंडेम’ समजण्यात येते. मराठी माणसाची प्रगती ही त्याच्या नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ‘माझा नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला’ हे एखाद्या गृहीनीचे वाक्य मोठ्या कौतुकाने सांगीतले जाते व ऐकले जाते. जणू काही नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला म्हणजे त्याने फार मोठा पराक्रम केला असा थाट या वाक्याभोवती असतो. पण किती झाले तरी ‘नोकरी’ ही एक मरतुकडी गायच असते, कारण ही गाय पुरेसे दूध कधीच देत नसते.
अशीच अजुन एक गाय असते ज्याला ‘जर्सी’ गाय म्हणतात. ही गाय भरपूर दूध देत असते पण ही गाय नेकरीवाल्यांच्या नशीबी नसते तर फक्त ‘उद्योग, धंदा, व्यवसाय’ करणार्‍या माणसांच्या नशीबी असते. पण मराठी समाजात या गाईला कोणी फारसे महत्व देत नसते. ‘माझ्या नवर्‍याचा धंदा एका लाखाचा एक कोटी रुपये झाला.’ हे एखाद्या गृहीणीचे वाक्य फारशा कौतुकाने बोलले पण जात नाही व ऐकले पण जात नाही. ‘माझे वडील बँकेत मॅनेजर आहेत.’ हे वाक्य ज्या अभीमानाने मुलाकडून सांगीतले जाते त्याच अभीमानाने ‘माझ्या वडिलांचे स्टेशनरीचे दुकान आहे’ हे वाक्य सांगीतले जात नाही. लग्न करणार्‍या मराठी मुलींना तर फक्त नोकरी करणारीच मुले हवी असतात. मामलेदार कचेरीत शिपायाची किंवा पट्टेवाल्याची नोकरी करणार्‍या मुलाला हुंड्यासकट मुलगी मिळते. पण वर्षाला 50 लाख रुपये इन्कम असलेल्या पण धंदा करणार्‍या मराठी मुलाला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जाते.
नुकचीच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी ‘स्टार्ट अप’ साठी अनेक योजना जाहीर करून उद्योग व्यवसायाच्या संधीचे भले मोठे दार उघडून दिले आहे. याचा अर्थ अनेकांना ‘जर्सी गाई’ मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पण मराठी माणूस याचा किती फायदा करून घेणार आहे हा कळीचा मुद्दा आहे.
‘नोकरी’ च्या मरतुकड्या गाईवर जगायचे का उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात शिरून भरपूर दूध देणारी जर्सी गाय मिळवायची का दोन्ही गायी संभाळायच्या हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही कां?
तुम्हाला काय वाटते?

Monday, January 11, 2016

तणाव...!!

शिक्षणहक्क कायद्याखाली विद्यार्थ्याचे सतत आणि सखोल मूल्यमापन व्हावे, एकदोन परीक्षांच्या आधारे त्याची ‘लायकी’ ठरविली जाऊ नये, अशा भूमिकेतून आठवीपर्यंतच्या मुलांना नापास न करण्याचे धोरण आणण्यात आले होते. त्याचा हेतू चांगला होता. परंतु, काही मुलांनी आणि शाळांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला...

................

स्मृती इराणी या खरे तर वादग्रस्त मंत्री. त्यांच्या जवळपास प्रत्येक वक्तव्याबाबत वाद झाले आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात जेव्हा, ‘आठवीपर्यंतच्या मुलांना नापास न करण्याचे धोरण बदलण्याचा सरकारचा विचार आहे,’ अशा आशयाचे विधान त्यांच्याकडून ऐकले तेव्हा सुखद धक्का बसला. आठवीपर्यंत नापास करायचे नाही, म्हणजे त्याचे मूल्यमापनही करायचे नाही, असा अर्थ काही शाळांनी घेतला की काय कोणास ठाऊक. मुलांनी मात्र शिक्षण न घेता वरच्या वर्गात जाण्याचा परवाना मिळाल्यासारखे वागायला सुरुवात केली. आज आठवीत गेलेल्या सामान्य मुलाला खरोखरच काय येते याचा आढावा घेतला तर धक्कादायक बाबी उघड होतात. अर्थात याला दुसरी बाजूही आहे. ही मुले जर इतकी ‘ढ’ असतील तर मग शिक्षक काय करत होते, त्यांना शिकविण्याचे काम शिक्षकांचे नाही का, असा प्रश्न विचारला जातो. तो काही अंशी खराही आहे. शाळेत जाऊनही शिकायची इच्छा नसणारे मूल शोधून सापडणारे नाही. मग त्याची अशी अवस्था का व्हावी? या सगळ्यात विरोधाभास असला तरी आठवीपर्यंत नापास न करण्याच्या निर्णयाने मुलांचे शैक्षणिक नुकसानच झाले हे नाकारून चालणार नाही.



शिक्षणहक्क कायद्याखाली विद्यार्थ्याचे सतत आणि सखोल मूल्यमापन व्हावे, एकदोन परीक्षांच्या आधारे त्याची ‘लायकी’ ठरविली जाऊ नये, अशा भूमिकेतून हे धोरण आणण्यात आले होते. त्याचा हेतू चांगला होता. परंतु, काही मुलांनी आणि शाळांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला. नापास होणार नाही, मग निकालाच्या तणावाखाली कशाला राहायचे, असा विचार काही विद्यार्थ्यांनी केला. काही शिक्षकांनाही हे सततचे मूल्यमापन जाचक वाटायला लागले. आधीच सरकारने भरपूर कामाला लावले आहे, त्यात हे वाढीव काम कशाला असा दृष्टिकोन झाला. त्यातून ही योजना फसत गेली. सगळ्यांनीच असा चुकीचा अर्थ घेतला असे नाही, पण ज्या सामूहिकरीत्या ही योजना राबवायला हवी होती, ती तशी राबविली गेली नाही, हे खरे. महाराष्ट्रातही हीच परिस्थिती निर्माण झाली. आपल्याकडे दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचे सर्वात मोठे ओझे आहे, असे समाजाने आणि शैक्षिणिक व्यवस्थेने ठरविल्यामुळे वेगळेच प्रश्न निर्माण झाले. या वर्षी, मार्च परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याची परीक्षा लगेच उरकून घेतली गेली हे बरे झाले. नाही तर एकदा का नावावर नापासाचा शिक्का बसला की मग त्यातून सावरणे विद्यार्थ्याला फार कठीण जाते. त्याच्या मनावरचे ओझे वाढवायला पालक, नातेवाईक आणि समाज असतोच. याही बाबतीत काही ठोस निर्णय घ्यावा लागेल.

***

भारतात प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाइल दिसत असले आणि इंटरनेटचा वापर सतत वाढत असल्याचे म्हटले जात असले तरी खऱ्या अर्थाने इंटरनेट क्रांती अजून पूर्णपणे झालेली नाही. तरीही बँकिंग क्षेत्रात पेमेंट बँकांना परवानगी दिल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन केले पाहिजे. या पेमेंट बँकांचे काम काय असणार, त्या बँक व्यवहारांशी जवळीक नसणाऱ्या सामान्य माणसाला फायदेशीर कशा आहेत, वगैरे बातम्या आतापर्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रश्न एवढाच आहे की आतापर्यंत ज्या बँका ग्राहकाला राजा मानत नव्हत्या, त्या बँकांचा कारभार यामुळे सुधारणार आहे की नाही? १९६९ साली बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले आणि या बँका भारतीयांच्या पैशाच्या जणू एकमेव आशास्थान बनल्या. परंतु, नंतरच्या काळात, विशेषत: गेल्या दीड दशकात खासगी बँका आल्यावर आणि बऱ्याच ग्राहकांनी तिकडे मोर्चा वळविल्यावर राष्ट्रीयीकृत बँकांची अवस्था पार चांगली राहिलेली नाही. व्यवसाय कोणताही असो, आज ग्राहक हाच राजा झाला आहे. हे जो लक्षात घेत नाही, तो लवकर डबघाईला येतो.

या बँकांपुढच्याही काही अडचणी आहेत हे मान्य. अपुरा कर्मचारीवर्ग सारे काम हाताळायला आणि ग्राहकाचे समाधान करायला असमर्थ ठरत आहे. असंख्य निर्बंधांमुळे, खासगी बँकांमध्ये होत नसलेला नियमांचा बागूलबोवा इथे मात्र दिसतो, याचा अनुभव मी अनेकवेळा घेतला आहे. काम नियमाने व्हायला हवे हे मान्य, पण ग्राहकाचाही विचार व्हायला नको का? हे सारे फक्त पेमेंट बँकेनेच बदलेल असे नाही. त्यासाठी आणखी बरेच काही करावे लागेल. प्रशासन लोकाभिमुख करावे लागेल. नाहीतर इंटरनेटच्या आक्रमणामुळे टपाल खात्याची जी अवस्था झाली आहे, ती बँकांची व्हायला वेळ लागणार नाही. राष्ट्रीयीकृत असोत वा खासगी वा सहकारी, आज प्रत्येक बँक ग्राहकाने बँकेत न येता घरच्या घरी कम्प्युटरवरून अथवा मोबाइलवरून बँकेचे व्यवहार करावेत, यासाठी प्रोत्साहन देत आहे. अनेक लोकांना नेटबँकिंगची भीती वाटते. ती घालविण्याचे काम सुरू आहे. एकदा सारे व्यवहार ऑनलाइन झाले की बँक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकेल किंवा त्यांना अन्य कामात हलवावे लागेल. ऑनलाइनचा हा फटका प्रत्येक व्यवसायाला बसणार आहे. ते ओळखून सध्या बँकांमध्ये येणाऱ्या ग्राहकाला असमाधानी अवस्थेत परत पाठविले गेले तर बँकांवरच त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. १९६९च्या निर्णयाचे चक्र उलटे फिरविण्याची हीच वेळ आहे का?

***

एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू, असे आपल्या आयुष्यात बरेच वेळा होते. हा प्रकार गेल्या १५ दिवसांत खेळाच्या मैदानावर भारताला दोनदा अनुभवावा लागला. क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून झालेला पराभव वेदनादायी होता हे खरे, पण त्याहूनही अधिक वेदना देणारा होता तो सायना नेहवालचा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत झालेला पराभव. कोणत्याही पराभवानंतर त्याचे विश्लेषण करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, अशा थाटात प्रत्येक भारतीय वागत असतो आणि आपलेच कसे खरे आहे हे तावातावाने सांगतही असतो. भारतीय खेळाडू अंतिम फेरीपर्यंत जातात पण शेवटच्या सामन्यात हार पत्करतात. त्यांच्याकडे अंतिम घाव मारण्याचे कसब (किलर इन्स्टिंक्ट) नाही का, असा प्रश्न अनेकदा विचारला गेला. टेनिसमध्ये आपल्याकडे अमृतराज बंधू होते. त्यांची झेप एखादा अपवाद सोडला तर जेमतेमच होती. रामनाथन कृष्णन आणि रमेश कृष्णन हेही ग्रँड स्लॅमचे एकेरीचे मैदान कधी मारू शकले नाहीत. नंतर आलेल्या लिएंडर पेसने मात्र एकेरीत नाही तरी दुहेरीत उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. हे जसे टेनिसचे तसेच बॅडमिंटनचे. प्रकाश पदुकोण यांच्यानंतर सायनाच चमकली. पी. व्ही. सिंधूची कामगिरी सातत्यपूर्ण नाही. हेच इतर खेळाडूंबाबत होताना दिसते आहे. एखादा विश्वनाथन आनंद पुढे येतो, बाकीचे एका विशिष्ट

टप्प्यापर्यंतच जातात. म्हणजे प्रत्येक खेळातला राष्ट्रीय विजेता, जागतिक विजेता व्हायला जे अंगात असावे लागते ते बहुतेकांमध्ये नसते. सायनाचा याला अपवाद आहे. आजच्या घडीला ती जागतिक क्रमवारीवर पहिल्या क्रमांकावर आहे. यामुळेच तिच्या पराभवामुळे एका डोळ्यात आसू असले तरी दुसऱ्या डोळ्यात हसू आले.

टेनिसप्रमाणेच बॅडमिंटनमध्येही गेल्या पाच वर्षांत खूप नव्या ताज्या दमाच्या मुली आल्या आहेत. त्यांच्यामुळे या खेळातली स्पर्धा अधिकाधिक तीव्र झाली आहे. यामुळे सायनालाही आपला खेळ अधिक उंचावावा लागत आहे. सायना स्वत: अधिक तणावाखाली खेळत आहे, जागतिक स्पर्धेचा अंतिम सामना हा इतर कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम फेरीसारखा शांतपणे खेळायला हवा, असे प्रकाश पदुकोण म्हणत असले तरी जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश केलेल्या कोणत्याही खेळाडूला खूप तणाव येणार हे उघडच आहे. परंतु, अशा तणावाखाली खेळूनच जिंकणाऱ्या खेळाडूलाच विजेतेपदाचा चषक मिळतो हेही खरे आहे. सायनाला मन:पूर्वक शुभेच्छा!

द्रविडा'यन

बुद्धिबळामध्ये वजीर असतो. हा वजीर कोणतीही चाल चालू शकतो. आपले राज्य वाचवण्यासाठी तो शेवटच्या श्वासापर्यंत जिकिरीचा लढा देत राहतो. असाच एक वजीर भारतीय क्रिकेटच्या नशिबाने लाभला, त्याचे नाव राहुल द्रविड. डाव जिंकण्यासाठी ज्याप्रकारे अगदी विचारपूर्वक पद्धतीने वजीराला वापरले जाते, त्याच प्रकारे भारतीय संघाने द्रविडचा विचापूर्वक वापर केला. द्रविडच्या करियरमध्ये त्याच्यावर अनेक प्रयोग करण्यात आले. सातव्या क्रमांकापासून ते पाचव्या, चौथ्या कधी-कधी तर अगदी वन डाऊन म्हणूनही द्रविड बॅट घेऊन मैदानात ठाण मांडायचा. त्यातही तिसरा क्रमांक त्याला सर्वात जास्त मानवला.


सामन्यांचे फॉरमॅट, खेळाचे नियम आणि स्पर्धा कोणतीही असो, द्रविडने आपले सातत्य सोडले नाही. कालांतरानं किपींगमध्येही त्याने हात आजमावला. स्लीपमधून हळूहळू आत सरकत पठठ्या थेट विकेट्स राखू लागला. स्टम्पच्या जवळ उभे राहणे, स्टम्पिंग, अपिलींग सर्वकाही द्रविड जणू सराईताहून सरस करू लागला. हात लावेल त्यांच सोन करणाऱ्या द्रविडने टीमच्या गरजेनुसार सतत स्वत:ला वेगवेगळ्या रोलमध्ये फिट बसवले. द्रविडला पूर्ण ऑल राऊण्डर म्हणतात. त्याच्या बॉलिंगची आकडेवारी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे, पण तीही टीपीवाल्या सामन्यात गोलंदाजी करून स्कोअरकार्डवर लागलेली. खरोखरच द्रविडला गोलंदाजी नेहमी करायला दिली असती तर आज तो ऑल टाइम फेव्हरेट ऑलराऊण्डर झाला असता. तरीही गोलंदाजीची छुटूरपुटूर आकडेवारी पकडूनही द्रविड ऑलराऊण्डरच आहे.

हा निस्वार्थी माणूस अनेक अविस्मरणीय खेळ्यांमध्ये कायम ऑन अदर एण्ड असायचा. काम करतात दोघे, पण प्रसिद्धी एकाच्या नावाने असे अनेकदा होते. द्रविडबद्दल अनेकदा असे झाले आहे. द्रविड चांगला खेळला तर समोरचा अधिकच छान खेळायचा. त्यामुळे वर्तमानपत्रातील फ्रंट पेज फोटोपासून 'मॅन ऑफ द मॅच'पर्यंत सर्व काही समोरच्याच नशिबी. पण द्रविडने याबद्दल कधीही कुठेही तक्रार केली नाही. इतर लोक मानसन्मान स्वीकारतानाही द्रविड मैदानाप्रमाणेच 'ऑन द अदर एण्ड'वरून पाहायचा. ज्या प्रकारे कलाकार एखादी कलाकृती लोकांना किंवा चाहत्यांना आनंद देण्यासाठी तयार करतो तसा द्रविड संघासाठी खेळायचा. स्वार्थासाठी द्रविडने सामन्यात गोंधळ घातल्याचे ऐकिवात नाही. अगदी सचिनपासून अनेकांवर हा फक्त रेकॉर्डसाठी खेळतो अशी टीका झाली. मात्र द्रविडबद्दल असे कधी नाक्यावरच्या गप्पांमध्येही ऐकण्यात आले नाही. याउलट द्रविडकडे जंटलमॅन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटचा ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर म्हणून पाहिले जायचे. Quotes on Dravid हे गुगल केल्यावर क्रिकेटचे जाणकार द्रविडबद्दल काय म्हणतात ते कळेलच; पण सामान्यांमध्येही द्रविड म्हणजे सभ्यता, संयम, संकटमोचक, परफेक्ट स्पोर्टमॅन म्हणूनच लोकप्रिय आहे अगदी आजही.

द्रविड तसा कमनशिबीच. करियरमधील सर्वच फॉरमॅटमधील शेवटचे सामने द्रविड खेळत असलेला संघ हारला. टी-२०, एकदिवसीय, टेस्ट अगदी चॅम्पियन्स लीगही द्रविडचा संघ हरला. आकडेवारी सोडली तर द्रविडची मिळकत ही त्यांच्या इतर संघ सहकाऱ्यांपेक्षा नक्कीच उजवी आहे. कधीच कोणत्या वादात नाही, नियम मोडले नाहीत, आरोप-प्रत्यारोप नाही, गटबाजी नाही, स्लेजिंग नाही, उद्दटपणा किंवा गर्वाने वागणे नाही, चाहत्यांकडून टीकेऐवजी प्रेमाचाच जास्त पाऊस द्रविडवर पडला, मात्र, प्रेम करताना किंवा निवड करताना अनेकांसाठी द्रविड सेकेण्ड बेस्ट किंवा दुसरा पर्याय म्हणूनच होता. खूप कमी लोकांसाठी द्रविड फर्स्ट होता. ट्विटरवर लाखांत फॉलोअर्स असूनही द्रविडचे अकाऊण्ट व्हेरिफाइड याला काय म्हणायचे? इथेही तो कमनशिबीच की ट्विटरचे दुर्लक्ष हेच कळत नाही.

सुरुवातीच्या कसोटी, एकदिवसीयपासून ते कारकिर्दीच्या उत्तरार्धातील टी-२०शी जुळवून घेणारा द्रविड अवर्णनीयच! म्हणजे सचिनच्या भन्नाट खेळ्यांमध्ये चोरटी धाव काढून स्ट्राइक देणारा द्रविड होता, लक्ष्मणच्या स्पेशल २८१च्या खेळीत जोडीदार द्रविड होता. सौरव गांगुलीने जिंकायला शिकवले तर द्रविडने क्रिजवर उभे राहायला शिकवले, पण यातील फक्त पहिलाच भाग अनेकांच्या लक्षात आहे. इतर तिघांमुळे हा फ्रेममध्ये दिसत नाही, पण तो सिक्रेट गार्डियनसारखा पाठीराखा आहे. आजही द्रविड भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा शोध घेतोय ज्युनियर संघाच्या प्रशिक्षकाच्या रूपातून. रिटायर झाल्यानंतर मध्यंतरी द्रविडने कॉमेन्ट्री बॉक्समध्ये अनेकांना शब्दांत पकडून 'क्लिन बोल्ड' केल्याचे किस्सेही व्हायरल झाले होते.

द्रविडबद्दल लिहिण्यासारखे खूप काही आहे. पण माझ्यासारखा त्याचा एक चाहता त्याच्या सर्व पैलूंबद्दल कसे लिहू शकणार? तुम्हालाही द्रविडच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकायचा असेल तर खालील कॉमेंट सेक्सनमध्ये तुमची मतं नक्की मांडा. 'मिस्टर डिपेंडेबल'बद्दलची तुमची मते त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडतील.

Friday, January 8, 2016

गणपतीचा आशीर्वाद - मोदक स्पेशल

गणपतीचा आशीर्वाद - मोदक स्पेशल - मराठी कविता | Ganapaticha Aashirwad - Modak Special - Marathi Kavita
नेवेद्यासाठी आईने
खोबरे घेतले खोवायला
समोरच्या आमराईने
दिले तोरण दाराला
आजच्या खोबर्‍यामध्ये असे
काय होते खास?
प्रसाद म्हणुन मिळणार होता
गोड मोदकाचा घास
हळूहळू वितळू लागला
गूळ खोबर्‍या भोवती
निरांजनात मिठी मारून
बसल्या होत्या वाती
श्वेत मुलायम समईमध्ये
भरले मोदकाचे सारण
धावणार्‍या नात्यांना लाभले
भेतावयाचे कारण
अनोख्या शब्दांच्या आरत्या
पितळी झांजांची त्यांना साथ
गुणगान ऐकूनी प्रिय पुत्राचे
प्रसन्न झाले भोलेनाथ
दुर्वांकूर व जास्वंद
झाल्या मस्तकी विराजमान
पंचपक्वानांनी नटले
सुगरास केळीचे पान
मुखी जेव्हा विरघळतो माझ्या
मोदकाचा हा प्रसाद
आभार त्या गणरायाचे
दिधला मोदकरूपी आशीर्वाद

माझं दैवत घरात

माझं दैवत उभं
माझ्याच घरात,
आयुष्यभरासाठी
'आशीर्वाद' देण्यास.
माझ्या मना
काहीच कळेना,
विसर मनाला
लागलो वारीला.
वारी-वारी करून
झालो मी बारीक,
खर्चुनी घरचं धन
लागली मनास सल.
सुखाच्या मी शोधात
कपाळी बुक्का लावत
माझं दैवत घरात
मी निघालो वारीत.
देहू-आळंदी झाले
पंढरी झाली-काशीलाही गेलो
मिसळलो मी वारीत
गुलाल खोबरे उधळत.
उशिराने कळुनी
चुकले मनास
'वैभवाचं मंदिर'
त्यावर कळस.
'तुळशीसम' प्रसन्न
सगळीकडं सहभाग,
सुखदुखात सोबत
"मना हिरवं रोपटं".
आली दाटुनी
नयनी आसवे,
मन माझे
पोरके झाले.
होतं घरीच दैवत
मी निघत वारीत,
मी निघत वारीत
माझं दैवत घरात.

चांदण्यात फिरताना भाग २

स्मिता हल्ली उदास उदास राहायची. तिच्या मैत्रिणींना सुद्धा कळलं होतं.
“काय झालं स्मिता? गप्प गप्प असतेस?” तशी स्मिता रडायला लागली.
“अगं, मी फक्त त्याला लग्नाचं विचारलं होतं ना. कुठे गेला कळतंच नाही मला.” रडतच ती सांगत होती.
“मग त्याला फोन करायचा ना.”
“नाही वापरत तो mobile.”
“पहिलं तुझं रडणं थांबव आणि मला नीट सांग काय झालं ते.” स्मिताने डोळे पुसले, जरा शांत झाली ती व सांगायला लागली.
“तुला सांगितलं होतं ना तसं त्याला विचारलं मी लग्नाबद्दल. त्याने उत्तरच नाही दिलं. दुसऱ्या दिवशी सांगतो म्हणाला तेव्हापासून आज आठवडा झाला तरी तो मला भेटलाच नाही.”
“अगं उशिरा निघत असेल तो.”
“नाही गं. रोज एक तास तरी थांबते मी. नाहीच येत तो.”
“आणि mobile चं काय बोललीस?”
“तो म्हणायचा गावात रेंज नाही येत मग mobile कशाला वापरायचा. घरीही फोन नाही. गावातच सगळे नातेवाईक आहेत म्हणतो. कोणाशी बोलायचे असेल तर त्यांना सरळ
भेटायलाच जातो, असं म्हणाला तो.” दोघीही गप्प झाल्या.
“आता काय करायचं गं. पप्पा बोलले मी येऊ का गावात त्याची चौकशी करायला.”
“नको, पप्पांना नको बोलावू. मला वाटते तो ना चोर असणार. गावात असे खूप असतात गं फसवणारे. तो घाबरून पळाला असणार तू लग्नाचं विचारल्यावर. तरी आपण पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवूया हरवल्याची.”
“ठीक आहे. चल.” असं म्हणत त्या दोघी हॉस्पिटल पासून जरा लांब असलेल्या पोलिस स्टेशन मध्ये पोहोचल्या.


“सर, आम्हाला एक व्यक्ती हरवल्याची तक्रार नोंदवायची आहे.”
“ठीक आहे. फोटो आणला आहे का हरवलेल्या व्यक्तीचा?” तश्या दोघी एकमेकांकडे बघायला लागल्या.
“नाही. फोटो तर नाही आहे.” स्मिताची मैत्रीण म्हणाली.
“फोटो नाही. मग त्याला शोधणार कसा. बरं नाव आणि पत्ता तरी आहे त्या व्यक्तीचा.” पोलिसांचा पुढचा प्रश्न.
“त्याचं नाव आहे यश.”
“पूर्ण नाव सांगा बाई.”
“माहित नाही सर.”
“बरं, पत्ता?”
“तोही माहित नाही.”
तसा तो पोलिस त्यांच्याकडे बघायला लागला. “तुमच्या ड्रेस वरून तुम्ही शिकलेल्या वाटता आणि तक्रार नोंदवताना काय माहिती दयावी एवढं साधं माहित नाही तुम्हाला.”
दोघी शांत बसल्या. कोणास ठाऊक त्या पोलिसाला त्यांची दया आली.
“बरं, त्या यशला कोणी पाहिलं आहे का?”
“हं... हो मी बघितलं आहे.” स्मिता लगेच बोलली.
“तो बघा, त्या खोलीत आमचा स्केच artist आहे. त्याचं वर्णन करून सांगा त्याला. तो काढेल चित्र त्याचं. मग आम्हालाही बरं पडेल शोधायला. मी आता बाहेर जातो आहे, चित्र झालं कि तक्रार नोंदवून घ्या, आम्हाला भेटला तर तुम्हाला कळवतो.” असं म्हणून तो पोलिस निघून गेला.
स्मिता लगबगीने त्या रूम मध्ये गेली.
“मला सविस्तर वर्णन सांगा. तसं मी स्केच काढतो.” स्मिताने लगेच त्याचं वर्णन करायला सुरुवात केली आणि त्याने स्केच काढायला. अर्ध चित्र झालं असेल तसा तो मधेच बोलला.
“थांबा.”
“का? काय झालं?”
“तुम्ही “आधार” हॉस्पिटल मध्ये काम करता का?” त्या प्रश्नाने दोघीही दचकल्या.
“आणि तुम्ही नक्की डॉक्टरच असणार.”
“हो. आम्ही आधार हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहोत. पण तुम्हाला कसं माहित?”
“मग हे स्केच काढायची गरजच नाही.” असं म्हणत तो उठला आणि कपाटातून कसलीशी फाईल काढली.
“हि फाईल बघा. वेगळीच फाईल बनवली आहे मी.” फाईल उघडताच एक स्केच होतं. यशचचं.... अगदी हुबेहूब...!
“हाच.. हाच यश आहे.” स्मिता आनंदाने म्हणाली. तिच्या मैत्रिणीने तिला गप्प केलं आणि त्यालाच उलट प्रश्न केला.
“पण याचं स्केच तुमच्याकडे कसं?” तसा तो हसला.
“तुम्ही नवीन आहात वाटतं इकडे?”
“हो. आम्ही दोघीही ६ महिन्यापूर्वीच जॉबला लागलो.”
“मग बरोबर. तुम्हाला माहीतच नसणार.”
“काय ते?”
“तुमच्याच हॉस्पिटल मधल्या आतापर्यंत ९ जणींनी येथे ‘यश’ संबंधी तक्रार नोंदवली आहे.” तश्या त्या दोघीही आश्चर्यचकित झाल्या.
“बघा त्या फाईल मध्ये सगळ्या तक्रारी आहेत. ७ महिन्यापूर्वीच नवीन तक्रार नोंदवली एका महिला डॉक्टरने.”
“कोणी? संगीता नाव होतं का तिचं?”
“हो. संगीताच नाव होतं तिचं.”
“आणि पुन्हा विचार करा या ९ तक्रारीपैकी कोणीच नंतर विचारायला आले नाही. तुम्ही उगाच तक्रार करू नका.”
“पण, त्याचं काय झालं आणि कसल्या तक्रारी आहेत?”
“सगळ्याच्या तक्रारी तो हरवल्याच्या आहेत.”
“हे कसं शक्य आहे?”
“ते मला माहित नाही पण तुम्ही उगाच तक्रार नोंदवू नका.” स्मिताला तर काही कळतच नव्हतं. बऱ्याच वेळाने तिची मैत्रीण बोलली,
“‘मग तुम्ही शोध नाही घेतला त्याचा?”
“या ९ तक्रारी गेल्या १० वर्षातल्या आहेत. प्रत्येक वर्षी एक तक्रार आहे आणि हे पोलिस स्टेशन तसं नवीन आहे, चार वर्ष झाली फक्त. जुन्या पोलिस स्टेशन मधले सगळे अधिकारी, शिपाई त्यांची बदली झाली. इकडे आता सगळेच नवीन आहेत. त्यामुळे जुन्या तक्रारींचं तसं काही माहित नाही. पण आम्ही आल्यापासून ४ तक्रारी आल्या. त्याची तपासणी केली आम्ही तरी त्याचा काही पत्ता नाही लागला आम्हाला. आता एवढा माणूस जाणार कुठे? तरी मला वाटते तो चोर असावा. शहरातल्या मुलींना फसवत असावा आणि काम झालं कि पळून जात असेल. पुन्हा तिकडे घनदाट जंगल आहे. त्या जंगलातच तो लपत असेल कदाचित. आम्हाला permission नाही आहे जंगलात जाण्याची.नाहीतर गेलो असतो तिकडे पण. तुम्ही तसच करा. तक्रार करू नका. तुमचा पत्ता आणि फोन नंबर देऊन ठेवा. मी कळवतो काही कळल तर.” त्या दोघींना काय चाललंय ते कळतच नव्हतं.
“हे कसं शक्य आहे? जो माणूस मला रोज भेटायचा तो १० वर्षापूर्वी कसा काय हरवू शकतो?” स्मिता तिच्या मैत्रिणीला बोलली.
“काही तरी नक्कीच गडबड आहे. मला तर वाटते.”
“काय?”
“तो खरंच चोर असेल गं.”
“अगं, मग तो पोलिसांना कसा भेटत नाही.”
“माझं डोकं गरगरायला लागलं आहे आता.”विचार करतच घरी पोहोचली ती. काहीच कळत नव्हतं तिला. अचानक तिला आठवलं त्याच्या ऑफिस मधून त्याचा पत्ता मिळू शकतो.
“काय नाव होतं कंपनीचं.. हा...Eco. तेच नाव होतं. त्याच्या बोलण्यातून एक-दोनदा ऐकलं होतं मी.” आठवून तिने दुसऱ्या दिवशी तिकडे जाण्याचा निर्णय केला. सकाळीच निघाली स्मिता त्याचं ऑफिस शोधायला. विचारत विचारत तिला कळल कि “Eco” नावाची एक कंपनी होती, शहरापासून थोडी अलीकडे. शेवटी पोहोचली एकदाची तिकडे. तिथे पोहोचल्यावर ज्याला त्याला विचारलं, त्यापैकी कोणालाच त्याची माहिती नाही. अगदी बॉसलाही. तिलाच सगळ्यांनी वेडयात काढलं. स्मिताला रडूच आलं. आता कुठे शोधू मी त्याला. रडत रडतच ती कंपनी बाहेर आली.
तेवढयात मागून “थांबा madam” असा आवाज आला.
वॉचमननी हाक मारली होती. “काय झालं madam? कशाला रडता. बसा इकडे. उनाचं बाहेर नका जाऊ. पाणी प्या.” स्मिता शांत बसली आणि पाणी पिऊन बरं वाटलं.
“काका, मी इकडे आले होते एकाला शोधायला. पण इकडे कोणालाच माहित नाही.”
“कोणाला?”
“यश नाव आहे त्याचं.”
“यश साहेब..” वॉचमन बोलला. तशी स्मिता आनंदाने उभीच राहिली.
“तुम्ही ओळखता त्याला? कुठे आहे आता तो?”
“माहित नाही madam. यश साहेब होते इकडे कामाला पण १० वर्षापूर्वी. नंतर कुठे गेले माहित नाही आणि इकडे मी सोडलो तर सगळेच नवीन आहेत.” या बोलण्याने स्मिताचा आनंद नाहीसा झाला.
“हा पण आमचे जुने साहेब त्याचा पत्ता आहे माझ्याकडे. त्यांनी यश साहेबांबरोबर काम केलं आहे. त्यांना माहित असेल.” ते ऐकून थोडीशी आशा पल्लवीत झाली स्मिताची. वॉचमन कडून पत्ता घेऊन ती पोहोचली शहरात. खूप शोधाशोध केल्यानंतर तिला सापडलं त्यांचं घर.
“नमस्कार सर, तुम्ही Eco कंपनीत जॉबला होतात ना?” दरवाजा उघडताच स्मिताने प्रश्न केला.
“हो. पण तुम्ही कोण?” आता त्यांना खरं तर सांगू शकत नाही.
“मी स्मिता, यशची मैत्रीण. तुम्ही ओळखता ना यशला.”
“तुम्ही प्रथम आतमध्ये या. मग बोलू आपण.” तशी स्मिता त्यांच्या घरात जाऊन बसली.
“हं... बोला आता. काय काम होतं तुमचं? आणि यशची कशी ओळख?”
“मी त्याच्या college मधली मैत्रीण आहे.” स्मिताला खोटंच बोलावं लागलं.
“खूप वर्षांनी आली मी भारतात. यशने त्याच्या ऑफिसचा पत्ता दिला होता मला. मी जाऊन आले तिथे. तर यशला तिथे कोणीच ओळखत नाही. वॉचमनने तुमचा पत्ता दिला म्हणून आले मी तुमच्याकडे.”
“यश Actually मलाही माहित नाही तो कुठे असतो सध्या.”
“म्हणजे?”
“तो होता माझ्या हाताखाली कामाला. चांगला होता. पण १० वर्षापूर्वी.”
“१० वर्षापूर्वी?”
“हो. मग अचानक कुठे गेला ते माहित नाही.”
“नक्की काय ते मला कळलं नाही सर.”
“तो अचानक जॉबला येईनासा झाला. नंतर काही तो आला नाही कधी.” सर बोलत होते.
“मग तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न नाही केला का?”
“केलेला. एक - दोनदा त्याच्या घरी जाऊन आलो. पण त्याच्या पप्पांनी सांगितलं कि त्यांनाही माहित नाही तो कुठे आहे ते.”
“तुमच्याकडे पत्ता आहे त्याचा?”
“आहे ना. ‘कुंभार’ गावात सरकारी क्वॉर्टर्स आहेत ना त्यापासून थोडयाच अंतरावर त्याचं घर आहे. ‘धर्माधिकारी’ नाव आहे घराचं.”
“अरे, माझ्या रूमच्या मागेच आहे घर वाटते.” स्मिता मनातल्या मनात बोलली.
“तरी तुम्हाला काय वाटत सर, कुठे गेला असेल तो?”
“तसं नक्की काही सांगू शकत नाही. पण तो हुशार होता. त्याला परदेशातून नोकरीच्या ऑफर सुद्धा आल्या होत्या. आम्ही काही त्याला सोडू दिलं नव्हतं आमचं ऑफिस. म्हणून तो परदेशात गेला असेल न सांगता आणि परदेशात जाणं त्याच्या कुटुंबाला सुद्धा मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांना देखील माहित नसेल ते. परंतू त्याच्या बायकोला माहित असेल कदाचित.”
“बायको?” स्मिता उडालीच.
“तशी बायको म्हणता येणार नाही. पण लग्न करणार होते ते लवकरच. मग तिच्या बरोबर तो गेला असेल.”
“काय... काय नाव होतं तिचं?”
“नाव... सरिता... हा.... सरिताच नाव होतं तिचं..... डॉक्टर होती ती. इकडे पुढे ‘आधार’ नावाचं हॉस्पिटल आहे ना तिकडे डॉक्टर होती ती. नंतर ती सुद्धा हॉस्पिटल मध्ये दिसली नाही.”
“बरं, Thanks Sir” असं म्हणत यशचा गावातला पत्ता घेऊन ती निघून आली. सगळंच काही विचित्र होतं. पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या तक्रारी आहेत. १० वर्षापूर्वी ऑफिस मध्ये, १० वर्षापूर्वी कामाला होता... बायको... काहीच नाही... कदाचित मग तो परत आला असेल परदेशातून.... कदाचित.