Friday, October 9, 2015

एका पर्यटनस्थळाची वेदना (भवताल)

एका पर्यटनस्थळाची वेदना (भवताल)
- श्रीकांत कात्रे
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 - 01:00 AM IST

सदाहरित महाबळेश्‍वरच्या निसर्गाचा आनंद लुटावा, असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळेच दरवर्षी पर्यटकांची वाढती संख्या महाबळेश्‍वर परिसराच्या पर्यावरणासमोर नवनवीन आव्हाने उभी करीत आहे. इथले रस्ते वाहनांची मांदियाळी अनुभवत आहेत. जगभरातील बहुतेक पर्यटनस्थळी प्लॅस्टिकमुक्तीला प्राधान्य दिले जात आहे. महाबळेश्‍वरमध्ये फक्त घोषणा होते. प्रत्यक्षात प्लॅस्टिकचा अमर्याद वापर दिसतो.
महाबळेश्‍वरची ताकद निसर्गाच्या आविष्कारात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्यावर अतिक्रमण होणार असेल, तर ते आविष्कार इतिहासजमा होतील आणि महाबळेश्‍वरचे महत्त्व नकळत कमी होत जाईल. हे टाळणे अजूनही शक्‍य आहे. दूरदृष्टीने आणि मनापासून पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी वन विभागाचे प्रामाणिक प्रयत्न, त्याहीपेक्षा येणारे पर्यटक व नागरिक यांनीही पर्यावरणाविषयी आस्था जिवंत ठेवली तरच हे शक्‍य आहे.

वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी गेल्या आठवड्यात महाबळेश्‍वरला भेट देऊन काही आदेश दिले. असे अधिकारी "पाहुणे‘ म्हणून येतात आणि आदेश देऊन जातात, हे चक्र अनेक वर्षांचे. अंमलबजावणी होत नाही, हा अनुभव. विविध पॉंइंटवर संकलित होणारे विविध कर एकाच ठिकाणी वसूल झाल्यास वाहतुकीची कोंडी टाळली जाईल, असा उपाय त्यांनी सुचविला आहे. पण वाहतुकीच्या कोंडीवर तेवढा एकच इलाज नाही. विविध टोल नाक्‍यांवरील गर्दी कमी होईल; पण पार्किंग व रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणाचे काय असे मुद्दे उरतातच. महाबळेश्‍वर प्लॅस्टिकमुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. पर्यटकांकडून येणारे प्लॅस्टिक आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारे प्लॅस्टिक अशी वर्गवारी करून यावर उपाय आखले पाहिजेत. पर्यटन विकास महामंडळाने महाबळेश्‍वरच्या विकासाचा आराखडा खारगे यांच्यासमोर सादर केला.
या आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा आदेशही त्यांनी दिला. या आराखड्यातील त्रुटी दूर करून विविध विभागांच्या समन्वयाने अंमलबजावणी व्हायला हवी. हा समन्वय कसा साधणार याचा आराखडा मात्र काहीच नाही. अंमलबजावणीसाठी वन विभागाची जबाबदारी मोठी आहे. पुरेशा गांभीर्याने लक्ष देणे हाच उपाय आहे. विविध पॉंइंटवरील वन समित्या जागरूक असत्या तर ही वेळ आलीच नसती. स्वच्छतेपासून व्यवस्थेपर्यंत फक्त फोटोपुरती कामगिरी होते. खऱ्या कृतीची आवश्‍यकता आहे. पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे आणि पर्यावरणाची देणगीही संवर्धित झाली पाहिजे, यासाठी सकारात्मक प्रयत्नांचीच गरज आहे; अन्यथा महाराष्ट्रातही एक "काश्‍मीर‘ होते, असे म्हणण्याची वेळ येईल.

No comments: